शिक्रापूरच्या ग्रामस्थांकडून प्रशासनाला कचरा भेट ः ग्रामसभा ठरली वादळी
शिक्रापूर -येथील असलेला कचरा प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी गावातील काही ग्रामस्थांनी ग्रामसभेत चक्क कचरा घेऊन प्रवेश केला. हा कचरा ग्रामपंचायत प्रशासनाला भेट देत कचरा प्रश्न न सोडविल्यास ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा मंगळवारी सरपंच जयश्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे यांसह काही ग्रामस्थ व महिलांनी हातामध्ये कचरा घेऊन “कचरा डेपो हललाच पाहिजे’, “धुराचा लोळ कमी झालाच पाहिजे’, अशी घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयात केली. त्यानंतर ग्रामस्थांनी कचराप्रश्नाबाबत प्रशासनास धारेवर धरले.
यावेळी उपसरपंच भगवान वाबळे, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, माजी सरपंच रामराव सासवडे, माजी उपसरपंच सागर सायकर, नवनाथ सासवडे, सुजाता खैरे, आबाराजे मांढरे, दत्तात्रय गिलबिले, ग्रामपंचायत सदस्य नीलेश थोरात, जयश्री दोरगे, गिता चव्हाण, मीना सोंडे, रोहिणी गिलबिले, शिक्रापूर ग्रामपंचायतचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशिद, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष मल्हारी राऊत, उत्तम गायकवाड, रमेश गडदे, त्रिनयन कळमकर, प्रशांत सासवडे, विजय लोखंडे, महेश शिर्के, काकासाहेब चव्हाण, रोहित खैरे, राजेंद्र केवटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा गायकवाड, अर्चना गजरे यांसह आदी नागरिक व महिला मोठ्या संख्येने ग्रामसभेत सहभागी
झाल्या होत्या.
27 लाख रुपयांच्या बादल्या वाया
शिरूर गावामध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करण्यासाठी तब्बल सत्तावीस लाख रुपयांच्या लाल आणि हिरव्या रंगाच्या बादल्या ग्रामस्थांना वाटप करण्यात आलेल्या होत्या. मात्र, त्या सत्तावीस लाख रुपयांच्या बादल्या देखील वाया गेल्या असल्याची चर्चा ग्रामसभेत चांगलीच रंगली.
प्रथमच व्हिडीओ चित्रीकरण
ग्रामपंचायतच्या होणाऱ्या ग्रामसभा अनेकदा तहकूब होत असतात, तर काही ग्रामसभा वादळी होत असतात, परंतु यापूर्वी कधीच ग्रामसभेचे व्हिडीओ चित्रीकरण झालेले नाही. मात्र, आज शिक्रापूरच्या इतिहासात प्रथमच खासगी व्यक्तीमार्फत ग्रामसभेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले.
विनाकारण खर्च
गावातील विकासकामांबाबत चर्चा करत असताना ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले हे नियोजित आराखडा वाचन करत असताना गावामध्ये ज्या ठिकाणी रस्त्यावर कायमस्वरूपी पक्के पेव्हिंग ब्लॉक बसविलेले आहे आणि रस्ता सुस्थितीत आहे. अशा पेव्हिंग ब्लॉक बसविलेल्या ठिकाणीच पुन्हा रस्त्याला निधी खर्च केल्याचे आढळून आले. मात्र, यावेळी लगेचच माजी उपसरपंच आबाराजे मांढरे यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे प्रशासनाचे विकासकामांकडे लक्ष आहे कि नाही असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.