नवी दिल्ली – रेल्वे भरती प्रक्रियेतील विलंब आणि घोळाबद्दल बिहार आणि उत्तरप्रदेशातील हजारो विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरत आहेत आणि ते मोठा हिंसाचार घडवत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकारात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात आणि रेल्वे भरती प्रक्रियेतील अडथळे त्वरीत दूर करावेत अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.
या संबंधात आपण रेल्वेमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या संबंधात त्वरीत निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली असून प्रलंबीत निर्णय आता त्वरीत घेतले जातील असे अश्विनी वैष्णव यांनी आपल्याला सांगितले आहे असेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांनी शांतता बाळगावी आणि रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करू नये असे आवाहन करतानाच कारवाईच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अन्याय केला जाऊ नये असे आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. रेल्वेच्या बिगर तांत्रिक जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये अनेक गैरप्रकार घडलेअसून त्यामुळे ही प्रक्रियाच रेल्वेमंत्रालयाने निलंबीत ठेवली आहे. त्यामुळे त्यासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यातून उत्तरप्रदेश आणि बिहार मध्ये विद्यार्थ्यांनी आता व्यापक आंदोलन चालवले आहे.