श्रीहरिकोटा : भारताच्या सूर्य मोहमेचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य -L1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.
आदित्य यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल.
चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. हा संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
आदित्य एल1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील. विशेष म्हणजे ग्रहणकाळात देखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचं इस्रोच्या शास्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत काही ना काही स्फोट होत असतात. पण या कोणत्याही स्फोटांचा परिणाम या यानावर होणार नाही. सूर्यामधील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास हे यान इस्रोला मदत करेल.
दहा दिवसांपूर्वीच भारताने चंद्रावर इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या यशस्वी मोहीमेनंतर आता इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. इस्रोची ही पहिलीच सूर्य मोहीम असून या मोहीमेकडे जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण आता या मोहिमेचं देखील यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. तसेच या यानाचा पुढचा प्रवास देखील सुलभ होण्यासाठी सध्या भारतीय प्रार्थना करत आहेत. तसेच हा प्रवास लवकरच यशस्वीरित्या पूर्ण होणार असल्याचा विश्वास देखील इस्रोच्या शास्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.