पुणे – सोशल मिडीयाचा वापर नात्यांसाठी घातक ठरत आहे. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे पन्नास टक्के दाव्यात पुरावे म्हणून सोशल मिडीयावरील जोडीदाराचे फोटो देण्यात येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा किती वापर करायचा, याचा नागरिक, तरुणांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटरसह विविध सोशल मिडीयाचा वापर तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही सोशल मिडीया वापरण्यात मागे राहिले नाहीत. महाविद्यालयीन मुले-मुली तर सेल्फी, मित्र-मैत्रिणींसोबत काढलेले फोटो सोशल मिडीयावर टाकत असतात. त्यावर लाईक मिळवत असतात. बिनधास्तपणे मित्र-मैत्रिशीणी चॅटिंग करत असतात. मात्र, हाच सोशल मीडिया संसारासाठी घातक ठरत आहे.
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये यावरील फोटो आणि चॅटिंगवरून संशय निर्माण होत आहे. हा संशय थेट कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे. लग्नापूर्वीच पती-पत्नीचे इतर मित्रांसोबत काढलेले फोटो न्यायालयात पुरावे म्हणून दाखल करण्यात येत आहे. ते फोटो कधी काढले, त्याचे इंटेशन काय होते, लग्नापूर्वी असलेल्या गुपिताची माहिती जरी जोडीदाराला दिली, तरी कालांतराने तो जोडीदार त्याचा पुरावा म्हणून वापर करत आहे.
चॅटिंगचेही तसेच आहे, कोणत्या परिस्थितीत कोणाशी चॅटिंग केले, त्यावेळी तो मोबाइल कोणाकडे होता, याचा विचार न कराता तो पुरावा दाखल केला जात आहे. कधी कधी फोटो क्रॉपही केले जात असतात. थोडक्यात, तरुणांना अगदी पाच ते दहा वर्षांपूर्वी फिरायला गेल्यानंतर अथवा इतर कारणामुळे सोशल मीडियावर टाकलेले फोटों अंगलट येत आहेत. सुखी संसारात संशयाचे विष निर्माण करत असल्याचे दिसून येते.
“सोशल मिडीयाचा अतिवापर टाळावा. कामापुरता मर्यादीत वापर करावा. एकमेकांशी बोलण्याचे माध्यम न बनविता सोय म्हणून तात्पुरता वापर करावा. सोशल मिडीया अॅप्लीकेशनवर विश्वास न ठेवाता दांपत्याने एकामेकांवर विश्वास ठेवावा. जेणेकरून कुटुंब, पती-पत्नीमध्ये सोशल मिडीयाच्या कारणावरून होणारे वाद थांबतील.” – अॅड. विराज करचे पाटील, माजी सदस्य पुणे बार असोसिएशन