सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीवर आरोप होत आहेत. सलमान खान स्टारर फिल्म “दबंग’, “बेशरम’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा अभिनव कश्यप याने सलमान,अरबाज, सोहेल आणि वडील सलीम खान यांच्यावर करिअर संपवण्याचे गंभीर आरोप केले आहेत. अशातच इंडस्ट्रीशी संबंधित फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज संस्था सलमानच्या समर्थनार्थ उतरली आहे.
या संघटनेचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे म्हणाले, जर अभिनव कश्यप याला सलमान खान किंवा त्याच्या कुटुंबीयांविषयी काही तक्रार असेल तर त्याने आधी दिग्दर्शकांची संस्था इंडियन फिल्म अँड
टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडे तक्रार करायला हवी होती. अभिनवने अशा प्रकारे खुलेआम आरोप लावणे चुकीचे आहे. इतकी वर्षे त्याने आमच्याकडे तक्रार का केली नाही, असा सवाल त्यांनी केला.
तसेच आयएफटीडीए ही दिग्दर्शकांच्या अडचणींवर गांभीर्याने विचार करते. एफडब्ल्यूआयसीई संस्थेनेही अभिनव कश्यपच्या तक्रारीची दखल घेतली असती. मात्र, अभिनवने असे न करता सलमानच्या कुटुंबावरआरोप लावणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
अभिनवने सलमानवर लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. लॉकडाऊनच्या काळात सलमान खान याने एफडब्ल्यूआयसीई या संस्थेच्या 23 हजार कर्मचारी आणि तांत्रिक कामगारांच्या खात्यात कोट्यवधी रुपयेट्रान्सफर केले आहेत. ज्यातून सलमानच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो, असे सांगत अशोक दुबे यांनी सलमानचे समर्थन केले आहे.