जळोची (पुणे) – भविष्यामध्ये राष्ट्रवादीचा आणि अजितदादांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला तर त्याचा आनंद आहे. पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.
राणे पुत्रांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाविषयी केलेल्या भाष्यावर आमदार पवार म्हणाले, या नीलेश व नितेश राणे यांनी 2024ला माझ्या मतदारसंघात यावे. तेथील जनतेवर माझा विश्वास आहे. मी जिंकेल न जिंकेल हे राणे नव्हे तर जनता ठरवेल. काहींना हवेत बोलायची सवय आहे. 2024 तेथे कोणीही येऊ द्या. कोण जिंकतय बघू…
राज्यात शिंदे गट, भाजप व मनसेच्या युतीचे संकेत हे केवळ मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून होत असेल, असे आमदार रोहित पवार म्हणाले. दसरा मेळाव्याला कोणाकडे उत्स्फूर्तपणे लोक आले हे राज्याने बघितले. त्यामुळे कोणी कोणाशीही युती केली तरी या मेळाव्यावरून मुंबई महापालिका निवडणूकीत काय होईल याचा अंदाज येत असल्याचे ते म्हणाले.
गतवर्षी महाविकास आघाडीचे सरकार असताना 110 टक्के पाऊस झाल्यानंतर भाजप नेतेमंडळींनी ओल्या दुष्काळाची मागणी केली होती. आता ते लोक सरकारमध्ये आहेत. यंदा 126 टक्के पाऊस झाला आहे. तरीही ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे कृषिमंत्री म्हणत असतील तर तो दुटप्पीपणा आहे, असे आमदार रोहित पवार म्हणाले.