मुंबई – दक्षिण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या आपल्या आगामी “आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 25 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हा बिग बजेट चित्रपट असल्यामुळे निर्मात्यांनी सरकारला एक विनंती केली आहे. “आरआरआर’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट दरात वाढ करावी असं सांगितलं आहे.
भारतातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या “आरआरआर’ हा चाहत्यांसाठी एक मेगा ट्रीट असणार आहे. त्यामुळे सिनेरसिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसह आलिया भट्ट आणि अजय देवगण यासारखे अनेक बडे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
हा चित्रपट सर्वप्रथम जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु त्याची रिलीज डेट पोस्टपॉन करण्यात आली होती. करोनाचा प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच चित्रपटसृष्टीवरही मोठा परिणाम झाला असून, ‘आरआरआर’ला सुद्धा याचा फटका बसला. दिग्दर्शक राजामौली यांचा हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे.