पुणे, {प्रभात वृत्तसेवा}: न्यायपालिकेत विविध प्रकारचे खटले दाखल होत आहेत. कार्यभार वाढल्यामुळे न्यायास विलंब होत आहे. कनिष्ठ वकिलांना वैद्यकीय प्रॅक्टिशनर्सच्या धर्तीवर इंटर्नशिप दिल्यास ज्युनिअर वकिलांना प्रत्यक्ष खटले चालविण्याचा अनुभव मिळेल, तसेच न्यायपालिकेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ मोहन वाडेकर यांनी व्यक्त केले.
जन अदालत संस्थेमार्फत अॅड. मोहन वाडेकर व अॅड. शारदा वाडेकर या दाम्पत्याला ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय वकील गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी, अॅड. वाडेकर बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष खामकर, डॉ. सुनील भंडगे, जनअदालतचे अध्यक्ष अॅड. सागर नेवसे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
गोखले म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यानंतर लष्करासाठी पहिली नियमावली लागू करण्यात आली. यामध्ये भारतीय राज्यघटनेचा मोलाचा वाटा आहे. भारतीय न्यायपालिकेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सामान्य नागरिकांसाठी न्यायप्रक्रिया किती महत्त्वाची आहे.
हे त्याला न्याय मिळाल्यावर त्यांच्या चेहर्यावरील समाधानातून दिसून येत असल्याचे सांगितले. या वेळी, अॅड. शारदा वाडेकर यांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. नरहर कुलकर्णी यांनी केले. अॅड. सुभाष वीर यांनी आभार मानले.