फलटण – गेल्या तीस वर्षांमध्ये मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यात कोणतेही भरीव विकासकाम करता आले नाही. त्यांनी विकासकामांचा नुसता दिखावा केला. आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्या बदल्यात पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यांच्या वयाचे भान राखून मी गप्प आहे, अन्यथा त्यांची जागा “आत’मध्ये असती, अशी घणाघाती टीका खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
विरोधक विकासकामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला होता. त्याला खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरवडी येथे पत्रकार परिषदेत उत्तर दिले. माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, नगरसेवक अशोक जाधव, भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते उपस्थित होते.
खा. रणजितसिंह म्हणाले, बारामतीकरांनी पळवून नेलेले नीरा-देवघरचे पाणी मी खासदार झाल्या झाल्या एका महिन्याच्या आत पुन्हा फलटण, माळशिरस तालुक्यांकडे वळविले होते. फलटण-लोणंद रेल्वे सुरू केली होती, नीरा-देवघर कालव्यांसाठी तरतूद, नाईकबोमवाडीत नवीन एमआयडीसी मंजूर केली होती. या कामांमध्ये रामराजेंनी खोडा घातला. राज्यात त्यांचे सरकार येताच बारामतीकरांनी नीरा-देवघरचे पाणी पुन्हा पळवले. लाचारीमुळे रामराजे त्यावर चकार शब्द काढत नाहीत. माझा स्वराज साखर कारखाना चांगला चालला असून पुढील वर्षी तो 15 हजार मेट्रिक टन गाळप करणार आहे.
अंदोरी, ता. खंडाळा येथे प्रोसेसिंग कारखाना सुरू करत आहोत. श्रीराम व साखरवाडी कारखान्यात आम्ही कधी राजकारण आणले नाही; परंतु आमचा कारखाना अडचणीत आणण्यासाठी रामराजेंनी सतत प्रयत्न केले. साखरवाडी कारखाना कवडीमोल किमतीने दत्त इंडिया कंपनीला देताना, रामराजेंनी त्यात पार्टनरशिप केली आहे. ऊस उत्पादकांचे थकीत 26 कोटी रुपये दिले नाहीत, तर साखरवाडी कारखान्याकडे मला माझ्या पद्धतीने लक्ष द्यावे लागेल, असा इशारा खा. रणजितसिंह यांनी दिला.
फलटणमध्ये भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. ठरावीक ठेकेदारांना कामे देऊन, त्यातून स्वतःची घरे भरली जात आहेत. यापुढे चुकीची कामे होऊ देणार नाही. अशी कामे करणाऱ्यांना माफी नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सचिन वाझे प्रकरण आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. या सरकारमुळे जनतेचे हाल होत आहेत. या सरकारने ताबडतोब पायउतार व्हावे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस लवकरच दिसतील, असा दावाही खा. रणजितसिंह यांनी केला.