मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत.
राज्यातल्या विविध ११ हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. तर १० हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालं आहे. आत्तापर्यंत १३ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या वादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे.यानंतर हे चक्रीवादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीला जाऊन धडकलं होतं.
यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी गुजरात पाहणी दौऱ्यावरुन उपहासात्मक टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
‘तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत’
ते पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली असेल म्हणूनच मोदी महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावेत’असं म्हणत त्यांनी मोदींच्या गुजरात दौऱ्यावर टीका केली आहे.