जयपूर -दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एक देश, एक निवडणूक या संकल्पनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ती संकल्पना अंमलात आल्यास मोदी पाच वर्षांतून एकदा मतदारांना चेहरा दाखवतील, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
राजस्थानमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक लढवण्याचा आपचा इरादा आहे. त्या पार्श्वभूमीवर, केजरीवाल यांनी राजस्थानचा दौरा केला. त्यावेळी जयपूरमधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकत्रित निवडणुकांना असणारा विरोध अधोरेखित केला.
नऊ वर्षे पंतप्रधानपदी राहिल्यानंतर एकत्रित निवडणुकांच्या मुद्द्यावरून मते मागितली जात आहेत. त्यातून आतापर्यंत कुठले काम केले नसल्याचे सूचित होते. सध्या दर काही महिन्यांनी निवडणुका होतात. त्यामुळे मोदींना जनतेला हिशेब द्यावा लागतो. मात्र, दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्यास गॅस सिलिंडरची किंमत 5 हजार रूपये होईल.
थेट निवडणुकांच्या आदल्या वर्षीच 200 रूपयांचा डिस्काऊंट दिला जाईल. टोमॅटोचा भाव किलोमागे 1 हजार 500 रूपये होईल. ते टाळण्यासाठी दरवर्षी 4 निवडणुका व्हायला हव्यात. त्यामुळे मोदी काहीतरी देतील. अन्यथा, ते पाच वर्षे चेहराही दाखवणार नाहीत, असे केजरीवाल यांनी म्हटले.