मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत त्यांनी लॉकडाउनसंदर्भात भाष्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘मिशन बिगिन अगेन…’ अर्थात ‘पुनःश्च हरिओम’ हा नारा देत राज्यामधील लॉकडाउनचे नियम शिथिल करत असल्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये टप्प्या टप्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र अशाप्रकारे केवळ आपल्यालाच पुन्हा लॉकडाउन करावा लागत नसून लॉकडाउन करताना जतनेच्या आरोग्याचा तसेच अर्थव्यवस्थेचा एकाच वेळी विचार करणे गरजेचे असते असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
“ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ यासारख्या मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांबरोबरच अगदी पिंपरी चिंचवड, चंद्रपूरसारख्या ठिकाणीही पुन्हा लॉकडाउन करावा लागत आहे. तर अशाप्रकारे परत परत लॉकडाउन करण्याची वेळ का येत आहे?,” असा प्रश्न राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा विचार करताना आर्थिक आणि आरोग्यासंदर्भातील बाजूही लक्षात घेणं महत्वाचं असल्याचे सांगितले. “एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की परत परत शहरं लॉकडाउन करण्याची वेळ आपल्यावरच आलेली नाहीय. हे जागतिक कटू सत्य आहे की या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारं आणि बोलणारं जगामध्ये कोणीच नाहीय,” असे सांगत उद्धव यांनी सगळीकडेच वेळोवेळी पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे सूचित केलं.
“एका बाजूला लॉकडाउन केला पाहिजे का?, तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत. लॉकडाउनने काय साधलं?, लॉकडाउन म्हणजे उपचार आहे का?, लॉकडाउनने आर्थिक संकट येत आहे, लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला. ठीक आहे बाबा, आम्ही तुम्हाला उघडून देतो. मात्र त्यानंतर दुर्देवाने लोकं मृत्यूमुखी पडले तर तुम्ही घेणार का त्याची जबाबदारी? जे आज सरकारच्या दारी येऊन बसले आहेत. दार उघडं म्हणून टाहो फोडत आहेत त्यांना इतकचं सांगेन की दारं उघडायला हरकत नाहीय. पण दारं उघडल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का?,” असा सवाल लॉकडाउनवरुन टीका करणाऱ्यांना विचारला आहे.