सोलापूर: कोरोनाच्या कठीण काळात भाजपच्या नेत्यांचं लक्ष राजकारण करण्याकडे जास्त होतं, म्हणून लोकांनी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य भाजपचे वरिष्ठ नेते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.
दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने काल समाजमाध्यमांवर भाजप नेत्यांवर चालू असलेल्या ट्रोलिंग विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच नागपूरमध्ये देखील आज भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली.
देवेंद्र फडणवीस यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यामागे टोळी कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त करत आज भाजपा नेत्यांकडून पुन्हा एकदा फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
काय म्हणाले जयंत पाटील?
भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.
आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का?
गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये.