भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होत आहे. संघाकडून देशवासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. 12 वर्षांनंतर भारतातच होत असलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद यजमान भारतीय संघानेच मिळवावे ही अपेक्षा संपूर्ण देशाला आहे. मात्र, त्यासाठी गेल्या वर्षीपासून भारतीय संघात सुरू असलेली प्रयोगशाळा ताबडतोब बंद केली पाहिजे.
कर्णधार रोहित व संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गेल्या अनेक मालिकांमध्ये सातत्याने नवोदितांना विविध सामन्यांसाठी संधी देत प्रयोग करत असल्याचे सांगितले होते. मात्र, विश्वकरंडकात असे काही प्रयोग करायला गेले तर अपयश ठरलेले आहे. संघातील जे खेळाडू वरिष्ठ आहेत, त्यांना वेस्ट इंडिज, आशिया करंडक व ऑस्ट्रेलिया विरुद्धची नुकतीच पार पडलेली मालिका यांत बाहेर ठेवून संघात अनेकदा प्रयोग केले गेले. मात्र, आता विश्वकरंडक स्पर्धेत अत्यंत गांभीर्याने व प्रत्येक संघाच्या कामगिरीचा अभ्यास करूनच मैदानात उतरावे लागणार आहे. आपल्या व प्रतिस्पर्धी संघांची बलस्थाने व कमकुवत दुवे हेरून त्यानुसार व्युहरचना केली गेली पाहिजे तरच यश मिळेल. सगळ्याच स्पर्धेचा विचार एकदम करण्याची गरज नाही. मॅच बाय मॅच खेळ व्हावा अशी अपेक्षा आहे.
संघात जे काही वरिष्ठ खेळाडू आहेत म्हणजे रोहित, कोहली, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, महंमद शमी, रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्या यांना रोटेट केले जाऊ नये. सामना कोणत्याही संघाविरुद्ध असो त्यात अनुभवी व वरिष्ठ खेळाडूंनाच खेळवण्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे. 1983 साली झालेली विश्वकरंडक स्पर्धा भारताने जिंकली. त्यानंतर हा करंडक भारतात परत आणण्यासाठी 28 वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर 2011 साली आपण हा करंडक जिंकला तसेच त्यानंतर 2013 सालची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली. मात्र, गेल्या बारा वर्षांत भारतीय संघाला आयसीसीच्या एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
बरोबर एका तपानंतर पुन्हा भारतात विश्वकरंडक स्पर्धा होत आहे, त्यामुळे मायदेशात होत असलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त सरस व जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. भारताकडे चांगले पर्यायी खेळाडू आहेत यात वाद नाही. मात्र, सतत संघात बदल करून संघ समतोल बिघडला तर त्याचा फटकाही संघाला बसू शकतो. द्रविड खरेतर एक संयमी व्यक्ती आहे; पण त्यानेच नवोदितांना जास्त संधी देणार असे सांगत सातत्याने प्रयोग केले. आता शुभमन गिल, ईशान किशन वगळता अद्याप संघाला मधल्या फळीत जबाबदारीने व जलद धावा करण्याची क्षमता असलेल्या फलंदाजाची गरज आहे.
सूर्यकुमार यादवला अद्याप टी-20 व एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेमका काय फरक असतो व या प्रकारात कशी फलंदाजी करायची असते हेच तो अद्याप शिकलेला नाही. केवळ एखाद्या खेळीवर विश्वास ठेवून त्याची निवड केली तर नुकसान ठरलेले आहे. गेल्या मोसमापासून संघात सातत्याने जे प्रयोग केले गेले त्यातून काय हाती लागले हे विश्वकरंडक स्पर्धेत समोर येणारच आहे. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेत असे प्रयोग अंगलट आल्याशिवाय राहणार नाहीत हे आता तरी रोहित व द्रविड युतीच्या लक्षात आले पाहिजे.
गुरुवारपासून सुरू झालेली ही स्पर्धा सगळ्याच संघांसाठी महत्त्वाची असली तरीही गेल्या बारा वर्षांचे अपयश भारतीय संघालाच जास्त खटकत आहे, त्यामुळे यंदा विजेतेपद मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. कारण यानंतरची स्पर्धा 2027 साली होणार असून आताच्या संघातील बरेचसे चेहरे तेव्हा संघात नसतील, त्यामुळे आताच्या संघात जे नवोदित आहेत तेच त्यावेळी वरिष्ठ बनलेले असतील व त्यांच्याकडूनही हीच अपेक्षा राहील. त्यामुळे नव्यांचा प्रयोग करण्यापेक्षा सर्वोत्तम संघच प्रत्येक सामन्यात मैदानात उतरायला हवा. त्यात काही नवोदितांना संधी देत समतोल साधता येत असेल, तर सोने पे सुहागा ठरेल.