निसर्गात अंत नाही. नव्यानं उमलत जाणं हा त्याचा निजधर्म आहे. लयाला जाऊन पुन्हा तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं यालाच निसर्ग मानावं, असं वाटतं. युगापासून सूर्याविषयीचे पृथ्वीचे आकर्षण याचे गूढ एकदम उकलले आणि निसर्गाच्या विराटत्वाची ओळख नव्यानं पटली ती एका उन्हाळ्याच्या दुपारच्या सोसलेल्या तगमगीनंतर… एका कंटाळवाण्या प्रतीक्षेनंतर! दुपार कंटाळवाणी जरूर आहे. पण त्यातही एक शिकवण लपलेली आहे. आत्ममग्नता हा तिचा गुणधर्म तो ती आपल्याला शिकवते! आयुष्याचा लेखाजोखा विचारात घ्यायला भाग पाडते. प्रत्येक ऋतूतील दुपार तुम्हाला वेगळा अनुभव देते. तो घ्यायला तुम्ही तयार हवे.
कशी असते दुपार? नि:शब्द, मंद की रेगांळणारी? तिला स्वत:ची एक गूढता असते. ऐन मध्यरात्री जर जाग आली आणि बाहेर खिडकीतून बघितले तर एक निःशब्दता सगळ्या वातावरणात भरून असते. पण ऐन मध्यरात्रीची निःशब्दता संगीतमय असते. तिला रातकिड्यांची, आकाशातल्या चांदणगीतांची, पौर्णिमेच्या चंद्राची साथसंगत असते. आकाशातला भरपूर पांढरा शुभ्र प्रकाश पाहून पहाट तर नाही झाली ना असा विचार करून सुरात तान मारणाऱ्या पाखरांची देखील तिला सोबत असते. उन्हाळ्यातील रात्रीला तर कडूलिंबाच्या कडूसर सुवासाची, मोगऱ्याच्या घनगर्द सुवासाची सोबत असते. पावसाळी रात्रीला मधुमालती, प्राजक्त, जाईजुई, सोनचाफा यांची सोबत असते. सारे चैतन्यमय आभास सजीव असतात. वातावरणात बोलकी शांतता असते. सोबतीला आकाशातील मेघगर्जना करीत असतात. कधी गंमत म्हणून वीजबाई आपला तोरा मिरवितात.
दुपार तशी नाही. ती लांबच लांब चालत जाणाऱ्या डाबंरी रस्त्यासारखी असते. गाई, म्हशीच्या मुखातील रवंथ करणाऱ्या घासासारखी असते. एक विचित्र दबलेली शांतता असते. उन्हाळ्यातल्या लांबलचक दुपारीला तर गरम झळांची निःशब्द झाडांच्या पानांची मख्ख साथ असते. साऱ्या वातावरणात एक थांबलेपणा, साचलेपणा असतो. दुपार नेहमीच कोरडी आणि कायम प्रतीक्षेत असल्यासारखी असते. निसर्गाप्रमाणे आपणदेखील सारी दुपार प्रतीक्षेत असतो. कधी वेळ टळून गेलेल्या आणि न आलेल्या कामवालीची वाट पाहतो, कधी पोस्टमनची तर कधी शाळेमधून अवेळी परतणाऱ्या मुलांची! कायम प्रतीक्षेत असते ही दुपार!
जसा मध्यरात्रीचा भर एक ते तीनच्या दरम्यान असतो तशी दुपार ही देखील 1 ते 3 च्या वेळात भरात असते, तारुण्यात असते. पण मध्यरात्रीच बहरतं तारुण्य सुखावह असतं, दुपारचं बहरतं तारुण्य कंटाळवाणं असतं! कधी विचार केला, देवानं जे सृष्टीचं प्रहर बांधलेले आहेत त्यामागे त्याचा निश्चितच काही हेतू आहे. तशी ही दुपार कंटाळवाणी जरूर आहे. पण त्यातही एक शिकवण लपलेली आहे ती कधीतरी काहीतरी आपल्याला शिकवून जात असते. आत्ममग्नता हा तिचा गुणधर्म तो ती आपल्याला शिकवते. आयुष्याचा लेखाजोखा विचारात घ्यायला भाग पाडते. तशी प्रत्येक ऋतूतील दुपार तुम्हाला वेगळा अनुभव देते. तो घ्यायला तुम्ही तयार असायला हवं.
सध्याचे दिवस उन्हाचे, सूर्यनारायणाच्या सळसळत्या तारुण्याचा प्रखर खुमार! कसा तेजाळ दिसतो एखाद्या कर्तृत्ववान योद्ध्यासारखा! सकाळचे म्हणण्यापेक्षा पहाटेचे काही कोवळे क्षण सोडले तर तो सारा दिवस दयामाया दाखवत नाही. शुभ्र चटकदार उन्हाचा वाढता कल्लोळ ऐन बाराच्या भरात अधिक्यानं भरून जात दुपारकडे वाटचाल करतो. तेव्हा त्या उन्हाचं रौद्ररूप अति भयंकर होतं. ऑफिसच्या मोठमोठ्या काचेच्या खिडक्यांमधून समोर दुपारच्या वेळी काळ्या अजगरासारखा सुस्तावलेला डांबरी रस्ता डोळ्यांना साहवत नाही. असं वाटतं रस्ता संपत नाही, की ही उन्हाळी दुपार संपत नाही. उष्ण श्वासाचं फुत्कार टाकणारा हा काळा डाबंरी अजगर ऐन दुपारी तुमच्या डोळ्यांना शिणवतो.
सारी दुपार शांत असते. बंद दाराच्या आड कुलर्स असतात, शीतपेयानं भरलेली फ्रीज असतात. रस्त्यावर चिटपाखरू देखील फिरकत नाही. दूरवर एखादा लाल माठवाला कुल्फीवाला दिसला तर दिसतो. पण त्याची कुल्फी घ्यायला आजकाल मुलं धावत नाहीत. ती घरातच बसून टीव्ही पाहत फ्रीजमधल्या थंड पदार्थांचा आस्वाद घेतात. झाडंझुडुपं कसाबसा उन्हाचा मारा सोसत तग धरून बसल्यासारखी दिसतात. वारा इतका पडलेला असतो की झाडाची पानं हलत नाहीत, ती चित्रातल्या झाडासारखी दिसतात. स्टील फ्रेम सारखं खिडकीतून दिसणारं बाहेरचं चित्र असतं.
रस्त्यावर तुरळक वर्दळ असते. पण तिला पाहून असं वाटतं की, कोणीतरी जबरदस्तीनं त्यांनाही काम करायला भाग पाडलेलं आहे. स्तब्ध राहणं हाच जणू तिचा, दुपारचा स्थायीभाव! नागपूर भागात डोंगरकडे दृष्टीस पडत नाही, पण जिथे काही प्रमाणात आहेत ते दुपारच्या वेळेस असेचं स्तब्ध असतात. अगदी अनादी काळापासून ही दुपार अशीच असते का, असं कुणाला तरी विचारावसं वाटतं.
दुपार ढळू लागल्यावर जरा वातावरणात हालचाल सुरू होते. एक चहाचा कप तुमच्या हालचालींना जिवंतपणा देतो. झाडं देखील आळोखेपिळोखे देत “चला आता संपली दुपार’ असा निःश्वास टाकतात. अचानक कुठून तरी हलक्या वाऱ्याच्या झुळका सुरू होतात. भलेही त्या उष्ण का असेना पण झाडांच्या पानांना हलवू लागतात. देवळाबाहेरचे पिंपळ पुन्हा सळसळू लागतात. आकाशात पश्चिमेकडे लगबग सुरू होते. सूर्याच्या तेजस्वी शुभ्र वर्णाचे आता केशरी रंगात रूपांतर होऊ लागते. हा केशरी रंग! किती म्हणून त्याचा देखणेपणा वर्णावा कोणत्याच प्रख्यात कारखान्यातील किंवा कोणत्याही ब्रॅन्डमध्ये म्हणा हा केशरी रंग तुम्हाला सापडणार नाही.
परवा सहजच ऑफिसमधून घरी परत जाताना या केशरी रंगाचे अप्रुपतेने दर्शन घडले आणि मन लोभावून गेले. आपण चित्रकार असतो तर निश्चितच हे दृश्य कागदावर रेखाटले असते. नकळत कविवर्य कुसुमाग्रज आठवून गेले. त्यांनी अशी निसर्गचित्र आपल्या कवितेत बंदिस्त केलेली आहेत. ते तर शब्दचित्रकार होते. हे दृश्य पाहून त्यांच्या कविता आठवल्या म्हणून मी स्वत:लाच शाबासकी दिली. त्यांचे पृथ्वीचे प्रेमगीत नव्याने स्मरले. काही ओळी अजूनही आणि केव्हाही घायाळ करतात. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धुलीकण! अंलकारिण्या परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण! गमे की तुझ्या रूद्र ओठातील आग प्यावी! मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा !! शेवटची ओळ खरंच मनाला जखमी करून जाते.
पृथ्वीच्या सूर्याविषयीच्या भावना नव्यानं जाणवतात तिचं वाट बघणं आपल्याला धीर देत. निसर्गात अंत नाही. नव्यानं उमलत जाणं हा त्याचा निजधर्म आहे. लयाला जाऊन पुन्हा तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं यालाच निसर्ग मानावं, असं वाटतं. युगापासून सूर्याविषयीचे पृथ्वीचे आकर्षण याचे गुज एकदम उकलले आणि निसर्गाच्या विराटत्वाची ओळख नव्यानं पटली. ती एका उन्हाळ्याच्या दुपारच्या सोसलेल्या तगमगीनंतर एका कंटाळवाण्या प्रतीक्षेनंतर! आणि क्षणात माझी मनोवृत्ती पालटली. दुपार लांबलचक नाही तर आत्ममग्न, नव्या नव्या कल्पना सुचविणारी नवा दृष्टिकोन देणारी अशी असते. ती तर माझी सखी दुपार आहे.
– अरुणा सरनाईक