एका परिसंवादाच्या निमित्तानं सीमा देव यांनी रमेश देव यांच्यासोबतच्या नात्यातील व्यक्त केलेल्या आठवणी…
रमेश देव यांची आणि माझी जोडी कशी जमली आहे, हे बहुतेकांना आतापर्यंत माहीत झालं आहे. तरीही काही गोष्टी मला या ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतात. “आलिया भोगासी’ या चित्रपटासाठी टेस्ट देण्यासाठी मी माझ्या आई-बरोबर ट्रेनमधून चालले होते. नलिनी हे माझं माहेरचं नाव. आई आणि मी मुंबईच्या चर्नीरोड स्टेशनवर ट्रेनमध्ये चढलो. पुढच्या ग्रॅंट रोड स्टेशनवर रमेश देव त्याच डब्यात शिरले. त्याआधी त्यांच्या “आंधळा मागतो डोळा’ या चित्रपटात मी त्यांनी साकारलेला खलनायक पाहिला होता. त्यामुळे त्यांचा चेहरा माझ्या चांगला लक्षात राहिला होता.
रमेश देव गाडीत शिरले आणि आमच्या समोरच्याच सीटवर येऊन बसले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून मी आईला म्हणाले, “अगं, ते बघ “आंधळा मागतो डोळा’मधील व्हिलन. त्यावर आई म्हणाली, “आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी?’ बाळबोध संस्कारांमुळे आई अशा गोष्टींना घाबरत असे. मग मी तिला म्हणाले, “अगं तेही गोरेगावच्या फिल्मिस्तान स्टुडिओत चालले असणार. त्यामुळे आपल्याला स्टुडिओ शोधायची वेळ येणार नाही.’ मी त्यावेळी अवघी 15 वर्षांची होते. नववीतूनच शिक्षण सोडलं होतं. नंतर रमेश देव आणि आम्ही दोघीही गोरेगाव स्टेशनवर उतरलो.
रमेश पुढे चालू लागले आणि आम्ही त्यांच्या मागून जाऊ लागलो. या दोघी सारख्या आपल्या मागे मागे का येत आहेत, असा विचार करून ते सारखं मागे वळून पाहू लागले. अपेक्षेप्रमाणेच ते फिल्मिस्तान स्टुडिओत गेले आणि त्यांच्या पाठोपाठ आम्हीही गेलो. तेथे आधी त्यांची टेस्ट झाली आणि नंतर माझी घेण्यात आली. तो चित्रपट “उपमा’ या नाटकावरून घेण्यात आला होता. त्यामध्ये जयश्री गडकर रमेश देव यांच्या नायिका होत्या आणि मी त्यांच्या बहिणीचं काम करत होते.
मी अगदी नवीनच होते. मला अभिनय नीटसा येतही नव्हता. त्या चित्रपटात रमेश देव आणि मी सोफ्याच्या मागच्या बाजूला उभे आहोत, असं एक दृष्यं होतं. त्यावेळी कॅमेरा जवळ आल्यानंतर रमेश देव यांचा क्लोजअप घ्यायचा आणि मी तेथून बाजूला सरकायचं अशा प्रकारचं दृष्यं होतं. त्या प्रमाणे दत्ता धर्माधिकारी यांनी मला तसं सांगितलं. माझ्यासाठी हे तंत्र नवीनच होतं. त्यामुळे कॅमेरा जवळ येताच मी उडी मारून बाजूला सरकले. त्यावर सगळेजण हसायला लागले. अशा पद्धतीने रमेश देव यांच्याशी माझी जुजबी ओळख झाली. पुढे फिल्मिस्तानमुळेच ती वाढत गेली. त्यानंतर व्ही. अवधूत यांच्या “ग्यानबा तुकाराम’ या चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं. त्यामध्ये रमेश देव नायक होते आणि मी त्यांची नायिका होते. त्या ठिकाणी आमची ओळख अधिक वाढली. त्या चित्रपटात एका बैलगाडीत गवताचा भारा ठेवलेला असतो आणि आम्ही त्यावर बसलेलो असतो, असं एक दृष्यं होतं.
दिग्दर्शकाने हाताने इशारा केल्यानंतर आमचा अभिनय सुरू होणार होता. त्यामध्ये एक गंमत झाली. दिग्दर्शकाने हाताने इशारा करण्यापूर्वीच ढग दाटून आले. ढग जाईपर्यंत आम्ही तेथेच थांबावं, असं ठरलं. बैलगाडीतील भाऱ्यावर आम्ही दोघंच बसलो होतो. त्यावेळी रमेश देव यांनी माझ्याकडे पाहून “माझ्याशी लग्न करशील का?’ असा प्रश्न विचारला. त्यावेळी तो त्यांचा चित्रपटातील संवाद असावा, असं मला वाटलं. त्यामुळे माझा संवाद काय आहे? असं मी त्यांना विचारलं. त्यावर तू “होय’ म्हणायचंस असं त्यांनी मला सांगितलं. त्यावर त्यांच्या प्रश्नावर मी खरंच “हो’ म्हणून उत्तर दिलं आणि नंतर मध्ये बराच काळ गेल्यानंतर माझा हा होकार सार्थकी लागला. त्यांच्या निमित्ताने मला एक अतिशय चांगला आणि समंजस जोडीदार मिळाला, पण होकार दिल्यापासून आमचं लग्न प्रत्यक्षात येण्यासाठी पाच वर्षे जावी लागली.
“ग्यानबा तुकाराम’ या चित्रपटानंतर आम्ही दोघांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये कामं केली. राजाभाऊ परांजपे हे माझे गुरू. त्यांच्या “सुवासिनी’ या चित्रपटात रमेश देव नायक आणि मी त्यांची नायिका अशा भूमिका होत्या, पण दरम्यानच्या काळात आमच्या दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यामुळे आमच्यामध्ये अबोला होता, पण चित्रपटातील संवाद वगळता आम्ही एकमेकांशी चकार शब्दही बोललो नाही. या चित्रपटात ते माझ्या पतीची भूमिका साकारत होते. पण, आम्ही एकमेकांशी अबोला धरूनच हा चित्रपट पूर्ण केला. अर्थात, चित्रपट पाहताना त्यावेळी आमच्यामध्ये अबोला होता हे कळू नये, असा अभिनय आम्ही केला होता. त्यानंतर राजा परांजपे यांच्याच “एक धागा सुखाचा’ आणि “वरदक्षिणा’ या दोन चित्रपटात आम्ही कामं केली. त्यापैकी एका चित्रपटाच्या वेळी आमच्या दोघांवर एक गाणं चित्रीत व्हायचं होतं. त्यादरम्यान रमेश देव यांनी माझ्याकडे एक चिठ्ठी पाठवली होती. त्यावर “आता तरी अबोला सोड’ असं त्यांनी लिहिलं होतं. त्यावेळी आमच्यात वास्तव आयुष्यात संवाद सुरू झाला.
नंतर 1963 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नाला मी होकार दिला असला तरी ते प्रत्यक्षात येण्यासाठी पाच वर्षे लागली त्याला एक कारण आहे. मी आईला घर घेऊन दिल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी अट मी देव यांना घातली होती. त्यामुळे ठरवल्याप्रमाणे मी पाच वर्षांत पैसे जमवून आईला खारमध्ये घर घेऊन दिलं आणि नंतर संसाराला लागले. कोल्हापुरात राजाराम टॉकीज होतं तेथे आमचं लग्न झालं. त्यावेळी आमची जोडी इतकी लोकप्रिय झाली होती की आमच्या लग्नाला आणि आम्हा दोघांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. ती गर्दी पाहून त्यांना पाहता यावं, यासाठी आम्ही दोघंही बाल्कनीत जाऊन त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर गर्दी पांगली. लोकांनी आमच्यावर किती प्रेम केलं त्याची प्रचितीच त्यातून आली.
मुंबईत राहू लागल्यानंतर आमचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यानंतर दीड वर्षाने अजिंक्यचा जन्म झाला. त्यावेळी मी सहा महिने चित्रपटात काम करत नव्हते. त्यानंतर आम्ही हिंदी चित्रपटांकडे वळलो. एक गोष्ट मात्र निश्चित प्रचंड उत्साही, सदैव सकारात्मक आणि आनंदानं जगण्याची ऊर्मी असणारा सहचर मला लाभला याबद्दल मी देवाचे नेहमीच आभार मानते.