नवी दिल्ली – राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे जे भाषण केले त्या भाषणावर तृणमुल कॉंग्रेसने सहा दुरूस्ती सुचना दोन्ही सभागृहांच्या सभापतींकडे सादर केल्या आहेत. सीएएच्या विरोधात देशभर जी आंदोलने सुरू आहेत त्यावर राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात कोणतेही भाष्य केलेले नाही, तसेच देशातील आर्थिक मंदीबद्दलही त्यांच्या भाषणात कोणताही उल्लेख नाही तसेच काश्मीरातील निर्बंधांबाबतही ते यावेळी काही बोललेले नाहीत असे आक्षेप तृणमुल कॉंग्रेस पक्षाने नोंदवले आहेत.
या आक्षेपांद्वारे या विषयावर संसदेत चर्चा उपस्थित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सीएए हा ऐतिहासिक कायदा आहे असे म्हटले होते. पण त्याच्या विरोधात जी आंदोलने देशभर सुरू आहेत त्यावर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. तृणमुल कॉंग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरेक ओबेरियन, व या पक्षाचे प्रतोद सुखेंदु शेखर रॉय यांनी या दुरूस्त्या सादर केल्या आहेत. या अभिभाषणात सीएए व एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा समाविष्ट करावा अशी त्यांची मुख्य दुरूस्ती सुचना आहे. लोकसभेतही या दुरूस्ती सुचना सादर केल्या जाणार आहेत. तृणमुल कॉंग्रेसचे लोकसभेत 22 सदस्य असून त्यांचे राज्यसभेत 13 सदस्य आहेत.
या खेरीज देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. ग्लोबल माध्यम स्वातंत्र्याच्या यादीत भारताचे स्थान खालावले आहे, भूक निर्देशांक आणि लोकशाहीं स्वातंत्र्य निर्देशांकाच्या यादीतही भारताचे स्थान खालावले आहे. सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि मंत्री प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत. त्यांना आवर घालण्याचा कोणताही प्रयत्न सरकारकडून होताना दिसत नाही. विरोधकांना विनाचौकशी डांबून ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. या साऱ्या प्रकारांना या अभिभाषणावरील दुरूस्ती प्रस्तावांद्वारे वाचा फोडण्याचा तृणमुलचा प्रयत्न आहे असे या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.