मुंबई : करोनाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र असे असतानाही ठाण्यामध्ये मसनेने हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेत आंदोलन सुरु केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनाला बसले आहेत. आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करु द्यावा अशी मनसेचे मागणी आहे. आपल्या मागणीसंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आपण माननिय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे लक्षात ठेवावं, असा उल्लेख करत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन सुनावले आहे. सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत, अशी टीका जाधव यांनी केली आहे.
आता भाजपा सत्तेत असती तर उद्धव ठाकरेंनीच हिंदू हिंदू केलं असतं. मात्र सत्तेत आल्यापासून ते हिंदू शब्दच विसल्याचा टोला जाधव यांनी लगावला आहे. दरवर्षी भगवती शाळेजवळच्या मैदानामध्ये मनसेकडून दहीहंडीचं आयोजन केले जातं. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्याने मनसेने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतला आहे.
शिवसेनेला राजकारण करताना करोना आडवा येत नाही मात्र हिंदूंचे सण साजरे करताना करोनाचा प्रादुर्भाव होतो का असा प्रश्न जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय. जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो ते चालतं. काल नारायण राणे कुडाळमध्ये पोहचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोक होते ते चालतं. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचं कारण दिलं जातं. याचं राजकारण करताना करोना आडवा येत नाही.
असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव यांनी उपस्थित केलाय. राज्य सरकारच्या निर्णयानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांमार्फत आयोजित केले जाणारे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले. मात्र, मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याचा दावा केला आहे.