नवी दिल्ली: दिल्लीतील वाहतूक व प्रदुषण समस्येवर उपाय म्हणून तेथील सरकारने वाहनांसाठी ऑड-ईव्हन म्हणजेच सम विषम नंबर प्लेटच्या वाहनांची नवी योजना काल पासून सुरू केली आहे. आज दुसऱ्या दिवशी परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन या योंजनेची पहाणी केली. ही योजना सुरळीत सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दिल्लीत एका दिवशी सम क्रमांकाची वाहने आणि दुसऱ्या दिवशी विषम क्रमांकांची वाहने सुरू ठेवण्याची ही योजना आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होऊन अन्य वाहनांसाठी वाहतूक सुरळीत सुरू राहील अशी अपेक्षा आहे. त्याला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे असे गेहलोत यांनी सांगितले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ही योजना यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. या योजनेच्या पहिल्या दिवशी पंधरा लाख वाहने बंद ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे त्यांनी म्हटले आहे. हे, निर्बंध मोडणाऱ्या वाहन चालकांना चार हजार रूपये दंडांची तरतूद करण्यात आली आहे.