नवी दिल्ली: करोनामुळे जागतिक स्तरावर असलेल्या लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसमोरील समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)च्या अंदाजानुसार भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रा व त्याच्याशी पुरक उद्योगक्षेत्रातील सुमारे 29 लाख जणांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती आहे. आशिया पॅसिफिक विभागात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा सर्वात जास्त वाईट परिणाम हवाई वाहतूक क्षेत्रासह पर्यटनावर पडत आहे.
देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान उड्डाणे महिन्याभरापासून बंद आहेत. लॉकडाऊन व हवाई वाहतुकीवर लावण्यात आलेले हे निर्बंध कधीपर्यंत कायम राहतील याबाबत अनिश्चितता आहे. या कालावधीत ज्या प्रवाशांनी हवाई वाहतुकीसाठी तिकीट आरक्षित केले होते, त्यांना तिकिटाचा पूर्ण परतावा द्यावा लागत असल्याने व सरकारने पुढील आदेश येईपर्यंत तिकीट आरक्षित करू नये, असे निर्देश दिलेले असल्याने सध्या हवाई वाहतुकीचे आरक्षण बंद आहे.
हवाई वाहतूक क्षेत्र आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटकाळातून मार्गक्रमण करत आहे. भारतातून हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना या कालावधीत तब्बल 85 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील एका नोकरीला जोडून प्रवास व पर्यटनाशी संबंधित 28 संलग्न रोजगार असतात, त्या सर्वांना या परिस्थितीचा फटका बसणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात निम्म्याने प्रवासी घट होण्याची शक्यता आहे. आशिया पॅसिफिक विभागात मोठ्या लोकसंख्येमुळे हवाई वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्याचे प्रमाणही आता घटण्याची चिन्हे आहेत.