शेवगाव : अक्षय तृतीयेचा सण यावेळी करोनाच्या चक्रव्यूहात सापडल्याने अनेकांना आपल्या पितरांना आई-वडिलांना जेवू घालण्याचे पुण्य साधता आले नाही. ग्रामीण भागात निदान गाईला नैवेद्य देवून लाभलेले समाधान शहरी भागात गायीअभावी तेही लाभू शकले नाही. देशात करोना विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. जो तो घरात दाराच्या आत आहे. सोशल डिस्टनन्सिग सांभाळण्यासाठी कोणाला घरात बोलावणे, कोणाकडे जाणे-येणे बंद झाले आहे.
अक्षय तृतीयेला देव आणि पितरांना उद्देशून दान व हवन केले जाते. आपल्या वाड वडिलांमुळे- पितरा मुळे आपण या जगात आहोत म्हणून अक्षय तृतीयेच्य दिवशी पितरांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो. हिंदूं संस्कृतीमध्ये पितराचे ऋण व्यक्त करतांना पितरांना जेवू घालण्याची प्रथा आहे. केळीचे पूजन करून आपल्या नातेवाईकापैकी किंवा जवळच्या व्यक्तिला जेवणासाठी बोलावले जाते. ते जेवतात म्हणजे त्यांच्या रुपात आपले आई वडिल जेवतात अशी त्यामागील भावना असते. म्हणून मिष्टान्नाचा बेत करून त्यांना जेवू घातले जाते .
मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना असे आई बाबाच उपलब्ध झाले नाहीत. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे कालगणनेतील सर्व तिथीचा क्षय होतो फक्त अक्षय तृतीया या एकमेव तिथीचा कधीही क्षय होत नाही. म्हणून या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुरू केलेले कोणतेही कार्य क्षय न पावणारे असते. अशी भावना असल्याने हिंदू संस्कृतीत या मुहूर्ताला विशेष महत्व आहे. या दिवशी सुरू केलेला कोणताही उद्योग व्यवसाय क्षय पावत नाही.
म्हणून अनेक उद्योगधंद्याचा प्रारंभ अक्षय तृतीयेला केला जातो. सोने-नाणे वाहनाची खरेदीही अक्षय तृतीयेला होत असते. वाहनाची खरेदीही अक्षय तृतीयेला होत असते. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्याचे मुहूर्तही साधले गेले नाहीत. विवाहाचे शुभकार्यासाठी मुहूर्त शोधले जातात . मात्र अक्षय तृतीयेसारखा दूसरा शुभ मुहूर्त नसल्याने या तिथीला मोठ्या प्रमाणात विवाह लावले जातात. अनेकदा मंगल कार्यालयही उपलब्ध होत नाहीत, एवढ्या विवाहाची संख्या असते. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परिसरात एक ही विवाह लागलेला नाही.