नवी दिल्ली – जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी हे १९४० मध्ये हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि बंगालमधील मुस्लिम लीगच्या युती सरकारचा भाग होते. ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती नसेल, तर त्यांचा इतिहास कच्चा आहे. दिशाभूल करणारी विधाने करुन मतदारांचा बुद्धीभेद करणे भाजपाच्या नेत्यांना चांगले जमते, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपासह मोदींवर टीका केली आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील निवडणूक सभेत सांगितले की, काँग्रेसचा जाहीरनामा स्वातंत्र्य चळवळीदरम्यानच्या मुस्लिम लीगची जुनाट विचारसरणी दर्शवतो. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा पूर्णपणे उमटलेला आहे आणि त्याचा जो काही भाग शिल्लक आहे, त्यावर डाव्यांचा पूर्ण वर्चस्व आहे. यात काँग्रेस अजिबात दिसत नाही.
काँग्रेसने भाजपवर फूट पाडण्याचे राजकारण केल्याचा आरोप केला आणि पंतप्रधान लक्ष विचलित करण्यासाठी डावपेच अवलंबत असल्याचा दावा केला. जयराम रमेश पुढे म्हणाले की, हिंदू महासभा सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांतात मुस्लिम लीगसोबतही युती करत होती. सोयीच्या धार्मिक भूमिका भाजपाचे नेते घेतात. मात्र, काँग्रेसचा विभाजनाच्या राजकारणावर विश्वास नाही.
सामाजिक न्यायाबाबत रमेश म्हणाले की, दहा वर्षांच्या अन्यायातून मुक्त होण्यासाठी भारतीय मतदार यावेळी निर्णायक मतदान करतील. मोदींना देशातील तरुण, महिला, शेतकरी आणि मजुरांची स्थिती आणि गेल्या दहा वर्षातील अन्याय यावरून लक्ष हटवायचे आहे. त्यामुळे ते चुकीचे इतिहासाचे संदर्भ देताना दिसत आहेत.