मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेत 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचा इशारा दिला. तसेच हिंदूंनी जिथे बांग सुरू असेल तिथं हनुमान चालिसा लावावी, अस राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या भूमिकेला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी कडाडून विरोध करत वादग्रस्त टीका केली आहे.
अबू आझमी म्हणाले की, शरद पवार यांच्या पायाखालच्या वाळूइतकी पण राज ठाकरेंची लायकी नाही. शरद पवार हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी पवारांना सांगेन की अशा भूंकणाऱ्यांचे तोंड बंद करा.
मशिदींवरील भोंग्यांना संविधानाने, सु्प्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. मग हे आहेत तरी कोण अशाप्रकारची भाषा करणारे?”, असा सवाल अबू आझमींनी केला. “ज्या मशिदींमध्ये लाऊड स्पिकरच्या आवाजांची मर्यादा जास्त आहे तिथे सरकारने कारवाई करावी, असंही आझमी म्हणाले.
दरम्यान ज्यांना जनतेनं नाकारलं, ते लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे नाटक करतात. ते कधी भाजपवर सडकून टीका करतात तर कधी भाजपसोबत जातात. ते कधी झेंड्याला हिरवा रंग लावतात तर कधी झेंड्यावरुन तो रंग काढून टाकतात. त्यामुळे अशा लोकांना महत्त्व देण्याची गरज नसल्याचं आझमी यांनी नमूद केल.