बारामती(प्रतिनिधी) – मागील वर्षभरात चांगले काम करणाऱ्या बारामती परिमंडलातील 60 जनमित्रांना (लाईनमन) व 13 यंत्रचालकांना (ऑपरेटर) मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याहस्ते ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सोबतच प्रत्येक मंडलातून दोन प्रमाणे सहा उपविभागांना व परिमंडलातून एकाची निवड झालेल्या बारामती विभागालाही गौरवाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्रदिनी बारामती येथील जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात हा सोहळा पार पडला.
पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता पावडे यांची तर व्यासपीठावर अधीक्षक अभियंता भाऊसाहेब ईवरे व चंद्रशेखर पाटील, सहा. महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापूरे, कार्यकारी अभियंते गणेश लटपटे, म्हसू मिसाळ व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे व प्रकाश देवकाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपविभागातून एका जनमित्राची व विभागातील एका यंत्रचालकाची या पुरस्काराची निवड होते. बारामती परिमंडलात 13 विभाग आणि 60 उपविभाग आहेत. त्याप्रमाणे पात्र 13 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मंडल स्तरावर नियुक्त समिती काही निकषांवर पुरस्कारासाठी गुणवंत कामगारांची निवड करते. यामध्ये त्यांनी केलेली वसुली, वीजचोरीवर मिळविलेले नियंत्रण व विशेष कार्याची दखल घेतली जाते.
कामात निकोप स्पर्धा व्हावी, कार्यसंस्कृती वाढीस लागावी यासाठी वरील पुरस्काराव्यतिरिक्त यावर्षी पहिल्यांदाच मंडलातून 2 उपविभागांची व एका विभागाची निवड करण्यात आली. बारामती मंडलातून बारामती शहर व वालचंदनगर उपविभाग, सोलापुरातून सोलापूर शहर ई व अकलूज-2 उपविभाग तर सातारा मंडलातून कराड शहर व मेढा उपविभागाची निवड झाली होती. तर विभागाच्या निकषांमध्ये बारामती विभाग अव्वल ठरला. वरील सर्व पुरस्कार सांघिक स्वरुपाचे असल्याने त्यांच्या टीमने हे पुरस्कार स्विकारले.
गेल्या दोन वर्षांपासून क्रीडा स्पर्धा झाल्या नव्हत्या. त्यामुळे 23 व 24 एप्रिल रोजी बारामती येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण 16 संघात हे सामने झाले. पंढरपूरच्या संघाने द्वितीय तर ऊर्जाभवन-अ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे पुरस्कार वितरणही महाराष्ट्रदिनी करण्यात आले.
विशेष पुरस्कारामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून 25 हजार रुपये रोख बक्षीसासह गुणवंत कामगार पुरस्कार मिळविणाऱ्या प्रधान यंत्रचालक अशोक आलदर यांचा व रोहित्र दुरस्ती विभाग (गाळणी संच) येथे रोहित्र दुरुस्ती करताना कंपनीची आर्थिक बचत करणाऱ्या नितीन जंगम व जिजाबा बोडरे यांनाही मुख्य अभियंता पावडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारासाठी परिमंडलातून उपस्थित राहिलेल्या वीज कर्मचारी, अभियंत्यांना मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता पावडे म्हणाले, बारामती परिमंडलातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक काम हिरीरीने केले. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक वसूली करण्यात यश आले. ‘एक दिवस, एक गाव’ सारखे उपक्रम सर्वांनी राबविल्यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकून, त्यांना सेवेची खात्री देण्यात यशस्वी ठरलो म्हणून आपल्याला वसूली करता आली. जुन्या कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या काळात यंत्रणा स्वत: उभारली आहे. मात्र नवीन विद्युत सहाय्यक त्याबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांचेसाठी विभाग स्तरावर प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. हे प्रशिक्षण देताना त्यांना विजेच्या खांबासाठी लागणारा खड्डा खोदण्यापासून, रोहित्र दुरुस्ती, मीटरचे वाचन, बिलींगचे ज्ञान देण्याचा प्रयत्न राहील.’
सूत्रसंचालन वरिष्ठ व्यवस्थापक महेश जाधव व तंत्रज्ञ रामेश्वर ढाकणे यांनी केले. आभार प्रदर्शन सहा. अभियंता रोहित राख यांनी केले. कार्यक्रमास वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.