नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशभरात सतत वातावरण बदल होताना पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत उष्ण वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच हवामान विभागाकडून देशातील वातावरणा संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. देशातील अनेक भागातील तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून आज देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आज दिल्ली आणि आसपासच्या भागांत वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, राजस्थानमध्ये कमाल तापमान 46 अंशांच्या आसपास पोहोचलं आहे. तसेच, 16 मे रोजी राज्यातील भरतपूर, बिकानेर दौसा जैसलमेर, नागौर, चुरू, सीकर, श्रीगंगानगर, हनुमानगढ जिल्हे आणि आसपासच्या भागांत वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही रखरखत्या उन्हामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. याशिवाय राज्यातील अनेक भागांत पारा 45च्या पुढे जाऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे.
वाढत्या उष्णतेचा परिणाम शेतपिकांवरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी अवकाळी आणि गारपीट अन् आता वाढलेली उष्णता यांमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हिंगोलीत तर वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या आहेत.