- अधिकारी, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष
- शेतकरी हवालदिल
पवनानगर – मावळ तालुक्यातील शेतकरी एका पाठोपाठ एका संकटांना तोंड देत आहे. मागील वर्षापासून करोना महामारीने शेतकऱ्याचे पुरते कंबरडे मोडले आहे. महामारीमुळे बाजारपेठा बंद, शेतकऱ्याच्या मालाल बाजारभाव मिळत नाही. त्यात चक्रीवादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले यातून सावरत भात रोपांची पेरणी केली असता आता खतांचा तुटवडा या संकटात मावळचा शेतकरी सापडला आहे. परंतु राज्यकर्ते आणि कृषी अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मावळ तालुक्यात युरिया खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. खत घेण्यासाठी शेतकरी प्रचंड गर्दी करत आहेत. तर युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तसंनतास रांगेत उभे राहून खताची खरेदी करावी लागत आहे. काही वेळा तर युरिया खताची गाडी आल्यानंतर पोलीस प्रशासनाची सुरक्षा विक्रेत्यांना घ्यावी लागत आहे. यामुळे कृषी अधिकारी व राज्यकर्त्यांनी लक्ष घालून खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मावळ तालुका हा पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला कोकणपट्टी लगत असून, तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भात हे येथील मुख्य पीक आहे. येथे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते.
मावळमधील शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व नदीच्या व बोअरवेलच्या पाण्यावर पंधरा दिवसांपूर्वी भातपेरणी केले होती. त्या भातरोपांची चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. ती हिरवीगार भातरोपे वाऱ्यावर डोलत आहेत. त्या रोपांना आता चागंल्या वाढीसाठी युरिया खताची आवश्यकता आहे. मात्र, युरिया मिळत नसल्याने भातरोपे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. कृषी केंद्रावर दोन-तीन दिवसांनी खत आले तर शेतकऱ्यांना तासन्तास उभे रांगेत उभा राहवे लागत आहे. खत घेण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रांवर मोठ्या प्रमाणत गर्दी करत आहेत. लवकरात लवकर युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. तर 100 टक्क्यांपैकी 30 टक्केच खताचा पुरवठा आम्हाला केलेला आहे. बाकीचा पुरवठा आम्हाला केल्यानंतर आम्ही तो शेतकऱ्यांना देणार आहोत. बाकीचा पुरवठा शासनाने आम्हाला लवकरात लवकर करावा, अशी मागणी खतविक्रेते दुकानदारांनी केली आहे. शासनाने दुकानदारांना वेळेवर खत उपलब्ध करून द्यायला हवे होते. मात्र राज्य सरकार अजूनही खते उपलब्ध करण्यात अपयशी ठरले आहे.
भातरोपे चांगली तयार झाली आहेत. मात्र युरिया खत नसल्याने रोपे वाया जाण्याची भीती आहे. कृषी केंद्रावर युरिया आला तरी तासन्तास उभा राहवे लागत आहे. चार चार दिवस युरिया मिळत नाही. शासनाने आम्हाला लवकरात लवकर खत उपलब्ध करून द्यावे.
– संभाजी तुपे, शेतकरी.