टोकियो – ऑलिम्पिकमध्ये 30 जुलै म्हणजेच आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारताचे काही खेळाडू पदकापासून एख पाऊल दूर असतील. पीव्ही सिंधू आणि दीपिका कुमारी सारख्या स्टार खेळाडूंवर देशवासियांच्या नजरा असतील. भारतीय महिला हॉकी संघ शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. मात्र, महिला संघ पुढील फेरी गाठण्याची अजिबात शक्यता नाही.
नेमबाजीत भारत;रिकाम्या हाताने परत
25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेची पात्रता फेरी संपताच मनु भाकरचा ऑलिम्पिक प्रवासही पूर्ण झाला. मनुने तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि तिला कोणत्याही प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नाही. राही सरनोबतला अंतिम फेरी गाठता आली नाही. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पिस्टल नेमबाजीत भारताला रिकाम्या हाताने परतावं लागलं.
अॅथलॅटिक्स : अविनाश साबळे सातव्या स्थानावर
अविनाश साबळे 3000 च्या स्टीपलचेस रेसमध्ये सातव्या स्थानावर आहे. त्याने 08: 20.20 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रत्येक हीटमधील पहिले तीन पुढच्या फेरीत प्रवेश करतील. याखेरीज उर्वरित खेळाडूंमधील अव्वल सहा वेळेचे खेळाडूही पुढील फेरीसाठी पात्र ठरतील.
गुरुवारी भारतासाठी हॉकी, तिरंदाजी आणि बॅडमिंटनमधून चांगली बातमी मिळाली, तर बॉक्सिंगमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली. देशाची स्टार बॉक्सर मेरी कोमला राऊंड ऑफ 32 मध्ये पराभव पत्करावा लागला. पीव्ही सिंधू, अतानू दास आणि सतीश कुमार यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.