नवी दिल्ली (वंदना बर्वे) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक आत्महत्या झाल्या असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (National Crime Records Bureau) अहवालातून पुढे आली आहे. 2021मध्ये संपूर्ण देशात एक लाख 64 हजार 33 लोकांनी आत्महत्या केल्या. यातील 22 हजार 207 आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. यापाठोपाठ तामिळनाडू (Tamil Nadu) (18925) दुसऱ्या क्रमांकावर असून मध्यप्रदेशात (14965) आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात आत्महत्यांच्या घटना वाढतीवर आहे. 2021मध्ये संपूर्ण देशात आत्महत्यांच्या 1,64,033 घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी, 2020मध्ये 1,53,052 आत्महत्या झाल्या होत्या. 2021मध्ये 2020च्या तुलनेत 7.2 टक्क्यांची वाढ झाली आहे.
महत्वाचे म्हणजे, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रात आत्महत्यांच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. याबाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेश आहे. पश्चिम बंगालमध्ये 13,500 आणि कर्नाटकात 13,056 आत्महत्या झाल्या आहेत.
केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास दिल्ली आत्महत्यांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 2840 आत्महत्या झाल्या आहेत. पुद्दुचेरीमध्ये 504 आत्महत्यांची नोंद झाली आहे. देशातील 53 मोठ्या शहरांमध्ये एकूण 25,891 आत्महत्या झाल्या आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वाधिक आत्महत्या (39.7) झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ सिक्कीम (39.2), पुडुचेरी (31.8), तेलंगणा (26.9) आणि केरळ (26.9) यांचा क्रमांक लागतो.
बेरोजगारी, नोकरी गमाविणे, एकाकीपणाची भावना, अत्याचार, हिंसाचार, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, दारूचे व्यसन, आर्थिक नुकसान आणि वृद्धापकाळ या कारणांमुळे आत्महत्या होत आहे. तर वेदना हे आत्महत्येचे मुख्य कारण असल्याचे एनसीआरबीने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात प्रमाण घटले
एनसीआरबीच्या अहवालानुसार, देशभरातील एकूण आत्महत्यांपैकी 50.4 टक्के आत्महत्या या पाच राज्यांमध्ये होतात. उर्वरित 49.6 टक्के आत्महत्या 23 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्या आहेत. दरम्यान, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात आत्महत्यांचे प्रमाण घटले आहे. यूपीमध्ये, ही टक्केवारी देशातील आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ 3.6 टक्के आहे. विशेष म्हणजे, यूपीची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या 16.9 टक्के आहे. (Shocking report! Maharashtra has the highest number of suicides in the country, followed by Tamil Nadu)