नालंदा – सध्या करोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. करोना संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक मृत्यू आता करोनानेच झाला असावा असा अंदाज बांधला जातो. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका नव्या नवरीचे ग्रहप्रवेशाच्या काही वेळाआधीच निधन झालं. त्यामुळे मुलीच्या माहेरच्या आणि सासरच्या अशा दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यातच नवरीचा मृत्यू करोनाने झाला असावा अशी भीतीही कुटुंबीयांना वाट होती.
बंधू बाजार येथील मनोज पंडित यांचा मुलगा विकास याचा सोमवारी रात्री विवाह झाला होता. त्यानंतर ते नवरीला घेऊन सकाळी घरी पोहोचले. मात्र घरी पोचल्यानंतर नवरीची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे ग्रहप्रवेशाच्या वेळीच नवरीला रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच नव्या नवरीने अखेरचा श्वास घेतला.
नवादा येथील गोपाल पंडित यांची कन्या आरती हिचा विवाह सोमवारी विकास पंडित याच्यासोबत पार पडला होता. त्यानंतर नवरीची वाजतगाजत विदाई करण्यात आली. तोपर्यंत सर्वकाही ठीक होतं. सासरी पोहोचल्यानंतर नवरीला गाडीतून खाली उतरविण्याची तयारी सुरू होती. मात्र त्याचवेळी नवरीची प्रकृती खालावली आणि काही क्षणातच नवरीचा मृत्यू झाला.
दरम्यान नवरीचा अचानक मृत्यू झाल्याने आणि करोनाच्या भीतीमुळे कुटुंबातील सर्वजन घाबरले होते. मात्र नवरीचा करोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.
नवरीच्या भावाने सांगितलं की, नवरीचं लग्नाच्या दिवशी पोट दुखत होतं. तसेच तिला उलटी देखील झाली होती. मात्र लग्नाच्या घाईत याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र सासरी पोहोचताच नवरीची तब्येत खालावली. नव्या नवरीच्या मृत्यूने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.