मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये उभी आडवी फूट पडली आहे. एकीकडे पक्षाचे बहुतांश आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. तर दुसरीकडे आता थेट ठाकरे कुटुंबातच फूट पाडण्यात शिंदे यांना यश आल्याचे दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून लवकरच ते शिंदे गटात सामील होणार असल्याचे समजते. निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतील असेही बोलले जात आहे.
कोण आहेत निहार ठाकरे?
निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असून बिंदुमाधव ठाकरे यांचे ते पुत्र आहेत. उद्धव ठाकरे व जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका तर राज ठाकरे हे त्यांचे चुलत काका आहेत.
निहार ठाकरेंचे भाजप कनेक्शन…
निहार ठाकरे यांचा विवाह काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येशी झाला आहे. अंकिता पाटील या सध्या काँग्रेस पक्षाकडून ज़िल्हा परिषद सदस्य आहेत. वडिलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देखील अंकिता पाटील अद्याप औपचारिकरीत्या काँग्रेसमध्येच आहेत. अर्थातच निहार ठाकरे हे अद्याप सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांच्या सासऱ्यांचे भाजप कनेक्शन उघड आहे.
शिंदे यांचा शिवसेनेवरच दावा
सेनेचे बहुतांश आमदार आपल्या गटात ओढून घेण्यात यशस्वी झाल्यानंतर शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच दावा ठोकण्याची मोहीम उघडली आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत शिंदे यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली असून त्याला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे.
१ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिंदे गटाने बंद पुकारल्यानंतर त्यांच्या गटातील १३ आमदारांना अपात्रतेच्या कारवाईची नोटीस देण्यात आली होती. याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. राज्यात शिंदे गट व भाजप यांचे सरकार आल्यानंतर शिंदे गटाने देखील आदित्य ठाकरे सोडून उद्धव ठाकरे यांच्या गटात असलेल्या उर्वरित आमदारांवर व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवला होता. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालया आता १ ऑगस्टला पुढील सुनावणी करणार आहे.