पुणे – महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-२०२३ प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. ब. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.
अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, त्यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटले जाते. समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचे कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केले. त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. अभिनयासोबत त्यांची शब्दफेकही ताकदीची होती, असेही ते म्हणाले.
आज बाबासाहेब पुरंदरे जरी नसले तरी प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचे जीवनकार्य पोहोचविण्याचे कार्य करणे ही त्यांना आदरांजली ठरेल, असे नमूद करून मुनगंटीवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक घरात पोहोचवला तर देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. असा विचार करत संशोधकाच्या भूमिकेतून प्रसाद तारे यांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पुस्तकरूपाने मांडल्याबद्दल त्यांनी लेखकाचे अभिनंदन केले.
यावेळी अशोक सराफ म्हणाले, कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला मिळणारे प्रेक्षकांचे पाठबळ महत्वाचे आहे, याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. असे पाठबळ कायम महाराष्ट्राच्या रसिकांनी दिले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’च्या रूपाने उभ्या केलेल्या नाट्यशिल्पाला तोड नाही.
या नाटकात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेला आवाज देऊन या नाटकाशी आपण जोडले गेलो. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराच्या रूपाने बाबासाहेबांना मी आपल्या घरात घेऊन जातो आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.