बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, काही बॅंकांनी शेतकऱ्यांची खाती गोठवली
थेऊर – शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी नुकसानभरपाईची रक्कम बॅंकेचे अधिकारी परस्पर कर्ज खात्यात वळती करून घेत असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत असल्याने अशा बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेत अडकून न पडता शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यावे, असे आदेश आल्याने जिल्ह्यात शिवसेनेकडून आज ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले, असे शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर माऊली कटके यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. राज्यात सत्तापेच सुरू असला तरी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. सत्ता कोणाचीही येवो आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारच, असे जिल्हा प्रमुख कटके यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले आहेत. मात्र, शासनाकडून त्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा तसेच अन्य स्वरूपाचे अनुदान जमा झाले असले तरी अनेकांच्या खात्यातून बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी अनुदानाची रक्कम परस्पर कर्जखाती वळवून घेतली आहे. काही बॅंकांनी शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. अशा प्रकारचा कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
विमाकंपनीने 25 टक्के आगाऊ देणे बंधनकारक
विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसानभरपाई आगाऊ देणे बंधनकारक असून त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, याकामी शासनाने वाढीव अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. काही बॅंका सध्या उद्भवलेल्या परिस्थिती समजून न घेता सक्तीची कर्जवसुली करीत आहे, अशी वसुली बंद करून याउलट पीक कर्ज शेतकऱ्यांना तातडीने द्यावे, अशीही मागणी शिवसनेकडून केली जात असल्याचे माउली कटके यांनी सांगितले.