मुंबई – “केंद्र सरकार व त्यांच्या सूत्रधारांना 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच. त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. अशा शब्दात शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे.
धाडसत्र व सूडाची छापेमारी ही त्यांची शस्त्रे. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थींवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण या न्यायनिवाडय़ास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे. अर्थात आज राज्यकर्त्यांचा कारभारच असा सुरू आहे की, देशात एक संभ्रमित युग अवतरले आहे. या संभ्रमित युगात आता कोण अवतार घेणार? नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल” असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
“विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला” असं म्हणत सामनातून भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात आलेत. तसेच “महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजपा व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले” असं देखील शिवसेनेने म्हंटले आहे. “संभ्रमित युग ! बदनाम कमळ!” या सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि शिंदे गटावर शिवसेनेने जोरदार हल्लाबोल केलाय.
काय म्हटलंय नेमकं सामनात
देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशा अनेक संभ्रमित गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला. ‘दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन कमळ ‘फेल’ गेले आहे. भाजप उघडा पडला आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. – बिहारमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ चालले नाही व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी अमित शहा यांना खुले आव्हान दिले की, ”ईडी, सीबीआय वगैरे लावून माझे सरकार पाडून दाखवा.” महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. सगळ्यांत महत्त्वाची घडामोड दिल्ली राज्यात घडली. ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘कॅबिनेट’च्या निर्णयाचे खापर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांवर फोडून त्यांच्यावर सीबीआयने धाडी टाकल्या.