मुंबई – मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामात ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या कालावधीत एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, या भ्रष्टाचारात शिवसेनेचा सहभाग आहे काय याचा खुलासा होण्याची गरज आहे असे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
आज पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेऊन एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईतील नागरिकांना वाहतूक कोंडी पासून वाचवण्यासाठी भाजप सरकारच्या काळात हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. पण हा प्रकल्प भ्रष्टाचाराने पोखरला गेला आहे. या प्रकल्पाच्या साऱ्या कामावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. यातील भ्रष्टाचाराचा संशय दूर होण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने हा घोटाळा केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
करोना लॉकडाऊनच्या काळात नागरिक जेव्हा घरात बंद होते त्या काळातच शिवसेनेचे हे गैरव्यवहार केले काय हे स्पष्ट होण्याची गरज आहे असेही शेलार यांनी म्हटले आहे. या संबंधात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे ही बाब तक्रार निवेदन सादर केले आहे. त्यात त्यांनी अचा उल्लेख केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कोस्टलरोडच्या भरावासाठी लागणारे दगड शासनाच्या खाणीतून आणावेत असे ठरले होते पण कंत्राटदाराने ते अन्य ठिकाणाहून उचलून आणले त्यातून 437 कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे असा आरोप त्यांनी केला आहे. कंत्राटदाराला ओव्हरलोड माल ट्रकमध्ये भरलच्या कारणावरून वाहतूक पोलिसांनी एकूण 81 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला, तो दंड का भरला नाही असाही सवाल त्यांनी केला.