मोदी किंवा शहांनी त्यांचा सत्कार करून नवा पायंडा पाडावा
मुंबई -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली मॉडेलची शिवसेनेने तोंडभरून प्रशंसा केली आहे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत, अशी टिप्पणी शिवसेनेकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
दिल्लीतील निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपने आक्रमक प्रचार करताना केजरीवाल आणि त्यांच्या आप सरकारविरोधात रान उठवले. त्याचा संदर्भ घेऊन शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाजपला जोरकस चिमटे काढले आहेत. भाजपच्या हातून महाराष्ट्र गेला.
झारखंडमध्येही त्या पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा या उद्देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपने जीवाची बाजी लावली. त्यानंतरही केजरीवाल सगळ्यांना भारी ठरत असल्याचे चित्र आहे. केजरीवाल यांच्या भूमिका आणि कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात. पण, हाती मर्यादित सत्ता असताना आणि केंद्र सरकारने वारंवार अडथळे आणूनही त्यांच्या सरकारने आदर्श काम केले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन मोदींनी दिल्ली मॉडेल इतर राज्यांत राबवायला हरकत नव्हती. मोदी किंवा शहा यांनी केजरीवाल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याचा नागरी सत्कार करून नवा पायंडा पाडायला हवा, अशी अपेक्षा अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली.
दिल्लीत कॉंग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवू पाहत आहे. पण, केजरीवाल यांनी पाच वर्षांच्या कामगिरीवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलिकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना केजरीवाल यांच्या पाठिशी उभी राहिली आहे.