केंद्रिय गृहमंत्री अमित शहांना सुभाष देसाई यांचे पत्र
मुंबई – मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यालये, बॅंका, रेल्वे तसेच टपाल कार्यालयात त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीने वापर करावा, अशी मागणी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.
यासाठी सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. केंद्र शासनाने राजभाषा धोरण अंगीकारलेले असून त्याद्वारे राज्याच्या अखत्यारितेतील सर्व कार्यालयांना त्रि-भाषा सूत्र लागू केलेले आहे. असे असताना केंद्र सरकारची प्राधिकरणे त्रि-भाषा सूत्राचे पालन करत नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
त्रि-भाषा सूत्रामध्ये दंडाची किंवा शिस्तभंगाच्या कारवाईची कोणतीही तरतूद नसल्यामुळे हे घडत असून संबधित विभागांना तत्काळ आदेश देऊन मराठी भाषा वापरण्याबाबत सूचना कराव्यात, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.