आळेफाटा – शिवसेना पाठीमागून वार करीत नसतो तर समोरूनच कोथळा बाहेर काढते, असे प्रत्युत्तर खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या “शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला’ या टीकेवर दिले. तसेच महाआघाडी सरकारमध्ये जरी तीन पक्ष असले तरी मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे. शिवसेनेची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
आळेफाटा (ता. जुन्नर) येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. याप्रसंगी उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार तथा उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, जिल्हा परिषद सदस्य नयना डोके,
जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आनंद रासकर आदी मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये मनसे तालुकाध्यक्ष दत्ता शिंदे, भाजपच्या स्वाती ढोले ,दादा ढोले आदी महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडी सरकार जरी असले तरी जुन्नर तालुक्यात मात्र शिवसेना स्वबळावर लढणार याचे खुले संकेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आले.
संजय राऊत म्हणाले की, जुन्नर तालुक्याची भूमी ही महाराष्ट्रला, देशाला मार्गदर्शन करीत असते. राममंदिर निर्मिती सोहळ्यासाठी जुन्नरचीच माती चांदीच्या कलशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्याला नेली होती, त्यानंतरच राममंदिर कामाला चालना मिळाली, असे त्यांनी नमूद केले. माऊली खंडागळे म्हणाले की,
तालुक्यातील काही शिवसैनिकांच्या बंडखोर कृतीमुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभवाला सामना करावा लागला. पक्षीय अंतर्गत वाद आणि विरोधी पक्षाने दाखविलेल्या आमिषामुळे शिवसैनिकांनी पक्षविरोधी काम केले;
परंतु विरोधी पक्षाच्या गोटात त्यांना सन्मानपूर्वक वागणूक नसले कारणाने बंडखोर शिवसैनिकांची घुसमट होत होती.त् यातील बऱ्याच शिवसैनिकांसह इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी नमूद केले.
शरद पवारांनी देशाचे नेतृत्व करावे
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ही मंडळी आपलीच असून शरद पवार साहेब हेही आपलेच असून त्यांनी देशाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.
आगामी निवडणुकीत शिवसेनेचा आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आगामी येणाऱ्या सर्वच लोकसभा निवडणुकीत शिवसेना सर्वच पदांवर बहुमताने निवडून येतील.
– शिवाजीराव आढळराव पाटील, (माजी खासदार तथा उपनेते, शिवसेना)