पुसेगाव – शेतकर्यांच्या दुधाला भाव मिळावा, तसेच अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवावा या मागणीसाठी शिवसेनातर्फे (उध्दव ठाकरे गट) मंगळवारी पुणे-बंगळुरू महामार्गावर शिवसैनिकांनी दुधाचे टँकर अडवून आंदोलन केले. यावेळी शेतकर्यांचा अंत पाहू नका, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश्य परिस्थितीने शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे.खरीप हंगामासह रब्बीच्या आशा मावळल्या आहेत.जनावरांना चारा उपलब्ध नाही.दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंब चालवणार्या शेतकर्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच दुग्धउत्पादक शेतकर्यांना 27,28 रुपये प्रति लिटर दर आत्ता शासन देत आहे .याचा जमा खर्च काढला असता शेतकर्याच्या हातात काही शिल्लक राहत नाही .मात्र पॅकिंगचे दूध 60रुपये लिटर अन शेतकर्याकडून डेअरीत किंवा गावोगावी फिरून गोळा केलेले जाणारे दूध 27 रुपये लिटर हा कोणता न्याय? असा सवाल प्रताप जाधव यांनी विचारला आहे.
दरम्यान, शासनाने शेतकर्यांकडून योग्य दराने दूध खरेदी करावे, अन्यथा दुग्धउत्पादक व शेतकर्यांच्या उद्रेकास येणार्या काळात सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा महामार्गावर दुधाचे टँकर अडवून आंदोलन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा उपप्रमुख दत्ता नलवडे, सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे, शहर प्रमुख गणेश आयावळे ,कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे, महिपती डंगारे, मुगुटराव कदम उपस्थित होते . सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना निवेदन दिले आहे.