शिरूर- हवेली मतदारसंघात मतदारांमध्ये परिवर्तनाचीच लाट
मांडवगण फराटा – शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा प्रचार करून निवडणुकीत विजय मिळवता येतो का, हा कळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मतदारांचा विचार करत नाहीत का, असाही प्रतिप्रश्न निर्माण होत आहे. या दोन्ही घटनांचा दोन निवडणुकांत चांगलाच अनुभव विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या दोन्ही दिग्गज उमेदवारांना घेतला आहे. बाबूराव पाचर्णे आणि अशोक पवार यांचा दोन विधानसभेचा प्रचार याबाबत साक्ष देणार आहे.
2009 मध्ये अशोक पवार यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. बाबूराव पाचर्णे यांचा त्यांनी पराभव केला. अशोक पवार यांनी पाच वर्षांत 500 कोटी रुपये विकास निधी आणला, अशी माहिती जनतेला देत त्या ठिकाणी विकासकामांची जाहिरात केली. 2014ची निवडणूक परत लढवली. त्यावेळी पाचर्णे यांनी पवार यांना पराभूत केले होते. पाचर्णे यांनी विकासकामांसाठी तीन हजार कोटींचा निधी आणला, असा प्रचार पाच वर्षे केला. याचा अर्थ तालुक्यातील मतदारांना विकास काय असतो, याची समज नाही, त्यांना विकास कशाला म्हणतात याची माहिती नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
विकास म्हणजे काय भाऊ –
शिरूर तालुक्यात पाचर्णे आणि पवार यांच्या माध्यमातून दहा वर्षांत 3500 कोटी रुपये विकास निधी आला आहे. याची माहिती दोघांनी आपापल्या पद्धतीने जनतेसमोर ठेवली आहे. मोठ्या रकमेचा निधी तालुक्यात यापूर्वी कधीच आणला नाही. निधीची रक्कम पाहता गावांमधून विकास नक्कीच झालेला असला पाहिजे; मात्र झालेला विकास गावकऱ्यांना कसा समजला नाही. समजला असेल तर त्यांनी दोन्ही वेळेस विकास करणाऱ्यांचा पराभव केला. हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. तालुक्यात एवढ्या मोठ्या निधीतील काही कामे होणार असतील, काही अपूर्ण असतील, असे समजले तरी मतदारांना ही बाब समजत कशी नाही, हासुद्धा प्रश्न चुकीचा ठरणार नाही.