सर्व फळबागांना 50 टक्के अनुदान मिळणार : शासनाचा निर्णय
पुणे – निर्यातक्षम डाळिंबांचे उत्पादन घेणाऱ्या सोलापूर जिल्ह्याची निवड डाळींब निर्यातीकरिता करण्यात आली आहे. संत्र्यांकरिता नागपूर तर द्राक्षांकरिता सांगली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व फळबागांना 50 टक्के अनुदान मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
शासनाच्या कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीकरिता डाळींब या फळाचा निर्यातक्षम दर्जा लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात 41 हजार हेक्टर क्षेत्र असून जिल्ह्यातील तीन-चार तालुक्यांकरिता ते मर्यादित आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अन्य पिके व फळबागांना प्राधान्य दिले जाते. सांगोल्यात 14 हजार 781 हेक्टर, पंढरपूरमध्ये 10 हजार 185 हेक्टर, माळीशरस सहा हजार 707 हेक्टर, मंगळवेढ्यात चार हजार 782 हेक्टर, मोहोळमध्ये दोन हजार 485 हेक्टर, करमाळा एक हजार 519 हेक्टर, माढा 574 हेक्टर, उत्तर सोलापूरमध्ये 273 हेक्टर, दक्षिण सोलापूरमध्ये 251 हेक्टर, बार्शीमध्ये 172 हेक्टर, अक्कलकोटमध्ये 76.66 हेक्टर अशा एकूण 41 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबांची लागवड करण्यात आलेली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील डाळींब लागवड क्षेत्रात वाढ करण्यासाठी पूरक उपाययोजना करताना नाफेडच्या माध्यमातून सवलत उपलब्ध करून दिली जाणार आहे. डाळींब लागवडीकरिता शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. डाळींब लागवडीसह टेस्टिंग लॅब, कोल्ड स्टोअरेज, दळण-वळण अशा अनेक पूरक बाबींचादेखील अनुदानात समावेश करण्यात आला आहे.
10 हजार हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट
सध्या सोलापूर जिल्ह्यातून निर्यात होणारे डाळींब मर्यादित स्वरूपाचे आहे. त्याला चालना देण्याकरिता सोलापूर जिल्ह्यात आगामी तीन वर्षांत 10 हजार हेक्टर डाळींब लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने पूरक निर्णय घेतले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या दिल्ली येथील पथकाने सोलापूरला भेट देऊन डाळींब लागवडीची माहिती घेतली. तसेच सध्या जिल्ह्यात असलेले डाळिंबाचे क्षेत्र, साठवणुकीकरिता असलेले स्टोअरेज, दळणवळणाची साधने, उत्पादक शेतकऱ्यांची संख्या, शासनाकडून मिळणारे अनुदान याविषयी या पथकाने माहिती घेतली.