पंजाबमधील वारे सतत बदलत असून, राज्यात सत्ता मिळवण्यात यश प्राप्त केलेल्या आपने पोटनिवडणुकीचा हा इशारा समजून, यापुढे सावधगिरी बाळगली पाहिजे.
अलीकडील काळात पंजाबमधील राजकीय चित्र आमूलाग्रपणे बदलले आहे. कृषी कायद्यांच्या प्रश्नांवरून शिरोमणी अकाली दलाने भाजपशी असलेली युती तोडून टाकली. परंतु राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीत मात्र भाजपप्रणीत रालोआ आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा पक्षाध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे. आमचे भाजपशी अनेक विषयांवर मतभेद आहेत. पण समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आम्ही नेहमीच कार्यरत असतो. एका गरीब कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतिपदावर बसवण्याचा हा मुद्दा आहे, असे बादल यांनी सांगितले.
अकाली दलाचे अध्यक्ष असलेले बादल हे फिरोजपूरचे, तर त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर या भटिंड्याच्या खासदार आहेत. पंजाब विधानसभेत अकाली दलाचे तीन सदस्य आहेत. पंजाबात अनेक वर्षे सत्ता उपभोगलेल्या अकाली दलाची दुरवस्था झाली असून, त्यामुळे आज ना उद्या हा पक्ष भाजपसमोर पुन्हा लोटांगण घालेल, यात शंका नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कॉंग्रेसचा त्याग केल्यानंतर, चरणजितसिंग चन्नी मुख्यमंत्री बनले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा खुर्दा उडाला आणि आम आदमी पक्षाची सत्ता आली. इतक्या अल्पकाळात पंजाबमध्ये एवढे बदल क्वचितच झाले असतील. या पार्श्वभूमीवर, शिरोमणी अकाली दल (अमृतसर) या पक्षाचे प्रमुख सिमरनजितसिंग मान यांचा राज्यातील संगरूर या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 5,800 मतांनी विजय झाला असून, याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
संगरूर हा आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मतदारसंघ. या जागेवरून भगवंत मान यांनी दोनदा विजय मिळवला असून, त्या त्या वेळी सिमरनजितसिंग मान यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. सिमरनजितसिंग हे माजी आयपीएस अधिकारी असून, 1984 सालच्या ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला होता. यथावकाश त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1999 साली त्यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. परंतु त्यानंतरच्या काळात आजवर त्यांना सतत पराभवाचाच सामना करावा लागला. 2022मधील पंजाब विधानसभा निवडणुकीतही आलमगढ विधानसभा मतदारसंघात त्यांचा दारुण पराभव झाला. सिमरनजितसिंग यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. मग संगरूर पोटनिवडणुकीत ते कशामुळे यशस्वी झाले?
संगरूरमधील आमदार हे लोकांना भेटत नाहीत, म्हणून मतदार नाराज होते. या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या नऊ जागा आहेत. त्या सर्वच्या सर्व जागा आपच्या आमदारांनी जिंकल्या. परंतु सर्वसामान्य लोकांची नाराजी तीव्र झालेली दिसते.
स्थानिक नेतृत्व आपल्या मागण्यांबाबत कोणताही प्रतिसाद देत नाही, त्यामुळे आपचे पक्षकार्यकर्ते वैतागले आहेत. राज्यसभेच्या सात जागांसाठी आपने निवडलेल्या उमेदवारांबद्दलही नाराजी होती. याचे कारण, त्यापैकी एकहीजण मालवा या भागातील नव्हता. आपने मालवामधील 69 पैकी 66 जागा जिंकल्या आहेत. 29 मे रोजी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाली. आप सरकारने त्याची सुरक्षा काढून घेतली होती. मूसेवालाच्या चाहत्यांनी या हत्येबद्दल आप सरकारलाच जबाबदार धरले आहे. मूसेवालाने कॉंग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु संगरूरच्या पोटनिवडणुकीत सिमरनजितसिंग यांना पाठिंबा देण्याचे त्याने ठरवले होते. या गोष्टीचा सिमरनजितिंग यांनी आपल्या निवडणूक प्रचारात पुरेपूर वापर केला.
2015 साली अकाली-भाजप यांची सत्ता असताना, धर्मनिंदेचे प्रकरण घडले होते. त्यावेळी “सरबत खालसा’ची एक बैठक सिमरनजितसिंग यांनी बोलावली होती. बैठकीला हजारो लोक उपस्थित होते. शेतकरी आंदोलनाच्या वेळी सिमरनजितसिंग यांनी पाय आणखी घट्ट रोवले. हे आंदोलन विभाजनवादी असल्याचा प्रचार समाजमाध्यमातून केला गेला. त्याचा फायदा सिमरनजितसिंग यांना मिळाला. याचे कारण, केंद्र सरकारच्या “अत्याचारांविरुद्ध’ ते सतत टीका करतच होते. संगरूरची पोटनिवडणूक ही कॉंग्रेस, आप आणि भाजप विरुद्ध धर्मनिरपेक्षतावादी प्रवृत्ती अशी असल्याचे चित्र सिमरनजितसिंग यांनी रंगवले. आपण धर्मनिरपेक्षतावादी असून, उपरोल्लेखित तीनही पक्ष हे अति उजवे असल्याची टीका ते करत राहिले. आपने गुरमेल सिंग नावाच्या सरपंचाला सिमरनजितसिंग यांच्या विरुद्ध उभे केले. ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असून, त्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात गुरमेल यांनी मदत केली होती.
मुख्यमंत्री मान यांनी संगरूरमध्ये शेवटच्या काही दिवसांत प्रचार केला. परंतु वातावरण बदलवण्यात त्यांना यश आले नाही. कोणत्याही परिस्थितीत संगरूरमध्ये आपचा पराभव करण्याचा चंग इतर पक्षांनी बांधला होता. विधानसभा निवडणुकीत धुरी या मतदारसंघातून भगवंत यांच्या विरुद्ध ज्यांनी अयशस्वीपणे निवडणूक लढवली, त्या दलवीर गोल्डी यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. भाजपचे उमेदवार केवल धिल्लॉं हे कॉंग्रेसचे माजी आमदार व उद्योगपती होते. अकाली दलाने तिकीट दिले होते, कमलजित कौर यांना. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांतसिंग यांच्या हत्येच्या कटात ज्यांना फाशीची शिक्षा झाली आहे, अशा बलवंतसिंग राजोना यांच्या त्या भगिनी होत. गंमत म्हणजे, केवल धिल्लॉं यांनी यापूर्वी संगरूर जिल्ह्यातील बर्नाला येथून विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. त्यांना तेथे अकाली दलाच्या उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली होती.