मुंबई – शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. ही घडामोड कृषी विधेयकांवरून मोदी सरकारला बसलेला हादरा मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्र सामाना अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
पंजाबच्या अकाली दलानेही एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा त्याग केला आहे. भाजपशी त्यांचीही प्रदीर्घ साथसंगत होती, पण ती आता सुटली आहे. अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाईंनी शेतकऱ्य़ाच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्रिमंडळातून आधीच राजीनामा दिला. तेव्हा बरे झाले राजीनामा दिला, सुंठीवाचून खोकला गेला याच आविर्भावात अकाली दल मंत्र्यांचा राजीनामा तडक स्वीकारण्यात आला. शेतकऱ्य़ाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केला आहे.
अखेर अकाली दलास राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडावे लागले व आणखी एक जुना, सच्चा साथीदार सोडून गेल्याबद्दल भाजपने अश्रूंची दोन टिपंही गाळली नाहीत. आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? हा प्रश्न आहेच. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे?
एनडीएचे दोन खांब भाजपबरोबर राहिले ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. आज या दोन्ही पक्षांनी ‘एनडीए’ला राम राम ठोकल्याने एनडीएत खरंच राम उरला आहे काय? पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक राज्यांत त्यांची सत्ता आहे. जेथे अल्पमत होते, तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळविली. केंद्रीय सत्तेचे बाहुबल हाती असले की, काहीच अशक्य नसते, पण सत्तेचे ‘गड’ जिंकले तरी एनडीएतील दोन सिंह मात्र गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार?
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उत्तम चालले आहे व सरकार पाच वर्षे धावत राहील, अशी स्थिती आहे. भविष्यात देशाच्या राजकारणात उलथापालथ घडविणारी आघाडी निर्माण होईल काय? याची चाचपणी सुरूच असते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे.
ज्या कारणांसाठी ‘एनडीए’ स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारून नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा ‘एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.