नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. बिगर-भाजपाशासित बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतीविषयक तीन कायद्यांना विरोध केला आहे. त्यामध्ये पंजाबचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग सर्वात आघाडीवर आहेत. त्यांनी या कायद्यांच्या तरतुदीत बदल करुन, आपल्या सोयीचे कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी करत असल्याचे जाहीर केले होते.
अमरिंदर सिंग यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना केजरीवाल म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण हे जाणतच असाल की, केंद्र सरकारने केलेल्या कोणत्याही कायद्यात राज्य सरकारला बदल करता येत नाही. तरिही आपण केंद्राच्या शेतीविषयक तीनही कायद्यांत बदल केल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यामुळे ही बाब राज्य घटनेला मान्य ठरते का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले की, आपण कृषीविषयक कायद्यांत बदल केल्याने पंजाबच्या शेतकरी बांधवांना किमान हमी रक्कम (एमएसपी) मिळणार आहे का? तर त्याचेही उत्तर नाही असेच येते. मग असे असताना आपण आपल्याच राज्यातील शेतकरी बांधवांच्या डोळ्यांत धूळफेक का करत आहात? आपल्या या घोषणा म्हणजे फक्त दिशाभूल आणि फसवणूक आहे, हे आपणास समजत नाही का?
कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि आडते व्यापारी यांची मक्तेदारी संपवणारे कायदे मोदी सरकारने केल्यानंतर भाजपाविरोधी पक्षांनी देशभर त्यावर टीका केली होती. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानेही या कायद्यावर टीका करत, केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचे पाऊल उचलले होते.