हिंदुस्थानच्या राजकीय पटलावरील तळपता तेजस्वी हिरा म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कार्यतत्पर कर्तबगार मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सर्वात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मध्यंतरी सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री आणि मुंबई पॅटर्नची तर जगाने नोंद घ्यावी अशी वॉशिंग्टन पोस्टने देखील दखल घेतली. हे सर्व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरकारचे यश म्हणावं लागेल.
अतिशय संयमी, निर्णयक्षम जनतेच्या मनातील भावनेला हात घालणारे कुठल्याही गोष्टींची तमा न बाळगता जनतेला हवे असणारे, निर्णय घेणारे, प्रसंगी कठोर, प्रसंगी भावुक, शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वोच्य प्राधान्य देणारे, महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनता कुटुंब मानणारे, त्यांना प्रत्येक संकटात असताना, दुष्काळी परिस्थिती, नापीक, महापूर, चक्रीवादळ, विमा कंपनी फसवणूक, बनावट बी-बियाणे तसेच अनेक अस्मानी संकटात शेतकरी बांधवांच्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख या नात्याने लाखो शेतकरी बांधवाना संपूर्ण कर्जमाफी योजना, तसेच तात्काळ पीक कर्ज योजना, निसर्ग चक्री वादळा मुळे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन तात्काळ नुकसान भरपाई देणारे, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन बी बियाणे, खते, औषध, अवजारे, शेतीविषयक आधुनिक सुविधा पुरवणारे कर्तबगार मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य संपूर्ण भारत देशाने पाहिले आहे.
यापूर्वीच्या कालखंडात देता की जाता, अयोध्या दौरा पहिले मंदिर…फिर सरकार जय श्रीरामचा नारा, स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी, गोरगरिबांना मोफत घरे, अनेक प्रकारची जनतेच्या हिताची आंदोलने यशस्वी करून तत्कालीन सरकारला सळो की पळो करून सोडले… त्याचीच प्रचिती सण 2014मध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप महायुती सत्तेवर आली; परंतु तत्कालीन भाजपला त्यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी किंबहुना सत्तेच्या लोभापायी, शिवसेना पक्षाचा उद्धवजींच्या कार्यकुशल नेतृत्वाचा सारासार विसर पडला. हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणनंतर शिवसेना संपली.. शिवसेना संपली.. असा त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला. पण शिवसेना ही असंख्य शिवसैनिकांच्या बलिदानाने, त्यागाने निर्माण जिवंत ज्वालामुखी आहे.
उद्धवजींच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे तळागाळातील शिवसैनिकांच्या बळावर, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, माता भगिनींच्या ताकदीवर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, भारतीय कॉंग्रेस पक्ष व अपक्ष मिळून महाविकास आघाडी पक्षाच्या ताकदीवर…छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कुठलीही पदाची अपेक्षा नसताना अनपेक्षितपणे इतिहास घडला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या गळ्यात पडली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आपल्या कुटुंबातील मुख्यमंत्री झाला आहे असे समजून सर्वांनाच अत्यानंद झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली.
मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या कामाला तडाखेबंद सुरवात केली, संपूर्ण शेतकऱ्यांना हवी असणारी खरी-खुरी कर्जमाफी करून दाखवली, जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. सगळीकडे जागच्या जागी निर्णय घेण्यात आले, प्रथमच जनतेला सरकार म्हणजेच…ठाकरे सरकार.. आपलं सरकार.. वाटू लागले.
मार्च 2020 पासून संपूर्ण जगावर करोना विषाणू थैमान घातले. संपूर्ण जग भयभीत झाले असताना मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी सर्व जनतेच्या हृदयात हात घातला, अतिशय वाईट, भयंकर परस्थिती असताना धैर्याने खचून न जाता अतिशय चाणक्य बुद्धीने निर्णय क्षमतेने, तमाम मायबाप जनतेला एक मायेचा हात, आपुलकीचे बोलणे, कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावून अक्षरशः शंभर हत्तीचे बळ प्रत्येकाला आपल्या ओजस्वी बोलण्यातून दिले, महाराष्ट्रातील या अत्यंत वाईट काळामध्ये जनतेला दिलेला माणुसकीचा आधार, सल्ला आणि सर्वांना प्रेमाचा संदेश नव्हे तर आदेशच… जनतेने जवळपास 4 महिने सर्वत्र लॉकडाऊन, “जनता कर्फ्यु’ स्वतःहून पाळला.
याच्या मागे यशस्वी मुख्यमंत्री उद्धवजींचे कार्यकुशल नेतृत्वाची झलकच पाहायला मिळाली. अनेक वादळे, संकटे आली; पण साहेब आपल्या निर्णयावर तसुभरही हलले नाही की भयभीत झाले नाहीत. दिवसरात्र महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरात, गावागावात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्कात राहून संपूर्ण राज्याची कुशल यंत्रणा कार्यान्वित करून तळागाळातील रुग्णांना, करोनाग्रस्तांना योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. सुरुवातीला विरोधकांनी बोंबा मारण्याचा प्रयत्न देखील केला परंतु उद्धवजींच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने प्रभावी यंत्रणा दिवसरात्र उभी करून संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला.
राजगुरुनगर शिवसेना शाखेचा रौप्य महोत्सव, हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या पुतळ्याचे अनावरण, भव्य शेतकरी मेळावा आदी कार्यक्रमाचे नियोजन, दौऱ्यांचे आयोजन करण्याची संधी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामुळे आम्हाला लाभली हे मी माझे भाग्य समजतो. असाच.. जनतेच्या मनातला.. शिवसैनिकांच्या मनातील जीव की प्राण.. मुख्यमंत्री आम्हाला कायमस्वरूपी लाभो, अशी भीमाशंकर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. समस्त सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांकडून वाढदिवसानिमित्त उद्धवजींना उदंड आयुष्य लाभो, हीच प्रार्थना!
जय हिंद.. जय महाराष्ट्र…!
-ऍड. गणेश सांडभोर, शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक