नागपूर – देशासह राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र आणि महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. भाजप केवळ निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. तसेच महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
नागपूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून शिंदे-फडणवीसांचे जंगलराज सुरू आहे, असा हल्लाबोल केला. नाना पटोले म्हणाले, राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? राज्याला गृहमंत्री आहेत का? असे प्रश्न पडावेत इतकी भयावह अवस्था आहे. राज्याच्या विविध भागांतून दररोज खून, बलात्कार, दरोडे, दंगली, विरोधकांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात दहा शहरांमध्ये दंगली झाल्या. दररोज वेगवेगळ्या शहरांत तणावाच्या घटना घडत आहेत.
सत्ताधारी पक्षांकडून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केले जात असून, जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस मात्र मूकदर्शक होऊन पहात बसले आहेत. गुंड आणि समाजकंटक दररोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे काढत आहेत, असा संतापही पटोलेंनी व्यक्त केला.
भाजपचा पराभव होणार
नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने सुरू केलेल्या विशेष महिनाभराच्या प्रचार मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री अमित शहा 10 जून रोजी मध्य महाराष्ट्रातील नांदेड शहरात सभेला संबोधित करतील. मात्र, अमित शहा यांच्या आगामी दौऱ्यामुळे निवडणुकीच्या भवितव्यावर काहीही फरक पडणार नाही. पुढील वर्षीच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.