मुंबई – प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते शेखर कपूर यांची पुण्याच्या फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एका लायक माणसाची योग्य ठिकाणी नियुक्ती केल्याबद्दल या नियुक्तीचे स्वागत होत आहे. त्याचवेळी शेखर कपूर यांच्याबद्दलही बऱ्याच बातम्या विविध माध्यमांत झळकत आहेत. मात्र त्याचवेळी काही कटू बातम्यांनीही पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
शेखर कपूर यांनी बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्येही बरेच काम केले आहे. त्यांनी अभिनयही केला आहे. मात्र त्यांचे नाव आले की डोळ्यासमोर चटकन मासूम आणि मिस्टर इंडिया हे दोन चित्रपट तरळतात. यातील एक अत्यंत भावनाप्रधान आणि दुसरा फॅन्टसी या सदरात मोडणारा. मात्र मिस्टर इंडियाने शेखर यांना अफाट प्रसिध्दी मिळवून दिली. त्याच चित्रपटाच्या संबंधित काही बातम्या पुन्हा झळकत आहेत.
जुन्या गाजलेल्या चित्रपटांचा रीमेक करणे हिंदी चित्रपटसृष्टीला नवे नाही. अनेक चांगले चित्रपट प्रेक्षकांनी नव्या अवतारातही स्विकारले आहेत, तर काहींना सपशेल नाकारले. मात्र रीमेक यशस्वी होण्याचे प्रमाण अपयशाच्या तुलनेत जरा जास्तच आहे.
अशातच एका निर्मात्याला अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेल्या मिस्टर इंडियाचा रीमेक करावासा वाटला व त्यांनी याबाबत जुळवाजुळवही सुरू केली होती. वर्षभरापूर्वीची ही घटना आहे. ते वृत्त शेखर कपूर यांना समजल्यावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
मिस्टर इंडियाच्या रीमेकवरून वाद सुरू आहे. मात्र त्याकरता कोणी माझी परवानगी घेतली का, त्यांना त्याची आवश्यकताही का वाटली नाही हा वादाचा मुद्दाच नाही. पण माझा एक प्रश्न आहे. एखाद्या दिग्दर्शकाच्या यशस्वी कलाकृतीचा तुम्ही जर रीमेक करत असाल तर मूळ चित्रपट ज्याने बनवला आहे, त्याच्याकडे काही क्रिएटीव्ह अधिकार आहेत की नाही, हा आहे. अशा शब्दांत त्यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली होती.
कायम सर्वच विषयांवर आपले मत जाहीरपणे मांडणारे प्रख्यात लेखक जावेद अख्तर यांनी यावर शेखर कपूर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे याचा बराच गाजावाजाही झाला.
शेखर साहेब, चित्रपटाची कथा, सिच्युएशन, पात्र, संवाद, गाणी एवढेच काय त्याचे शिर्षकही तुमचे नाही. हे मीच तुम्हाला दिले होते. त्याची तुम्ही चांगली मांडणी केली एवढेच. त्यामुळे मिस्टर इंडियावर माझ्यापेक्षा तुमचा अधिक अधिकार आहे असा दावा तुम्ही कसे करू शकता? ही तुमची कल्पना नव्हती व तुमचे स्वप्नही नव्हते असे जावेद अख्तर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
शेखर कपूर यांच्या निवडीमुळे या दोघांमधील ट्वीटयुध्द पुन्हा प्रकाशझोतात आले आहे.