शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने दिलेला प्रतिसाद दुःखद असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते व माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केलंय. काँग्रेस शेतकरी आंदोलनातून धडा घेऊन पुन्हा एकदा जोमाने उभा राहील असा आशावादही त्यांनी वैयक्त केला. ते एका नामांकित वृत्तवाहिनीशी बोलत होते.
नवी दिल्ली – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत दिल्लीकडे कूच केली आहे. ‘दिल्ली चलो’चा नारा देत पंजाब, हरियाणा व इतर राज्यांतून राजधानीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर रोखण्यात आले आहे.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु असतानाच आज काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आंदोलनाला सरकारने दिलेल्या प्रतिसादावर हल्लाबोल केलाय. याखेरीज त्यांनी शेतकरी आंदोलनातून धडा घेऊन काँग्रेस नव्या जोमाने उभा राहील असा आशावादही व्यक्त केला आहे. एका नामांकित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची भूमिका मांडली.
यावेळी सिन्हा यांना शेतकरी आंदोलनाबाबत विचारले असता, “मी शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे एक संवेदनशील कलाकार व व्यक्ती म्हणून पाहतो. त्यांच्यासोबत जे होतंय ते दुःखद आहे. सर्वांना माहिती आहे की, कृषी कायदे कशाप्रकारे बनवले गेलेत. संसदेमध्ये ज्या प्रकारे हे कायदे मंजूर करण्यात आले अथवा करवून घेण्यात आले त्यावरून लोकांमधील विश्वासच उडालाय. सरकार आणि नेते आपली विश्वासहर्ता गमावून बसलेत. त्यांची मोठमोठी आश्वासने असोत वा कोणतीही समस्या सोडवण्यासाठी दिलेला शब्द असो त्यांनी (सरकार) आजपर्यंत तो कधीच पाळला नाही.” असं सांगितलं. शेतकरी आंदोलनात शेतकऱयांनी दाखवलेल्या एकीचे व स्वयंशिस्तीचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
यावेळी काँग्रेसने आता राहुल गांधी यांच्यापुढे जाऊन विचार करायला हवा का? असं विचारलं असता त्यांनी, “मला अद्यापही काँग्रेसचे भवितव्य उज्वल असल्याचं दिसतंय. काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांचं निधन झालं, आम्ही चिंतेत आहोत की त्यांची उणीव भासेल. पक्षातील चुका दुरुस्त करण्यासाठी आम्ही चिंतन करतोय. मी मानतो की देशापुढे काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. काँग्रेस शेतकरी आंदोलनातून धडा घेऊन आत्मपरीक्षण करेल व पुन्हा एकदा जोमाने उभा राहील” असं उत्तर दिलं.