कराड – लोकसभा निवडणुकीच्या काळात मी बाहेर राहू नये, यासाठी मला खोट्या गुन्ह्यात अडकवून, तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठीच तीन तीन वेळा चौकशी झालेल्या गुन्ह्यात मला अडकवण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा सुरू होता, असा गंभीर आरोप सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
निवडणूक प्रचार दौर्यानिमित्त आ. शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी कराड शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. शिवसेना ठाकरे गटाचे समन्वयक व माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या निवासस्थानी भेट देऊन, त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर हॉटेल संगम येथील सभागृहात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी सिद्धार्थ मंगल कार्यालयात रयत संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या दौर्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, खोटी कलमे लावून अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या केसमध्ये तथ्य नाही. गुन्हा सिद्ध झाल्यास जनतेच्या दरबारात फाशी जाईन. न्यायालय आणि जनतेवर माझा विश्वास आहे. पूर्वीच्या गुन्ह्याची चौकशी होऊनसुद्धा पुन्हा मला त्यामध्येच अडकण्याचा प्रयत्न कोण करतंय, ते सर्व समजतंय; पण ते बोलायची ही वेळ नाही.
कराड तालुक्यात काँग्रेस, ठाकरे गट व रयत संघटना असे वेगवेगळे मेळावे का घेतले जात आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, महाविकास आघाडी एकसंध असून, माझा कार्यकर्त्यांशी थेट परिचय व्हावा या उद्देशाने हे मेळावे घेतले जात आहेत. शरद पवार एकीकडे ‘यशवंत विचार’ म्हणतात आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देतात.
या उदयनराजेंनी केलेल्या आरोपाबाबत, ते म्हणाले, शरद पवार यांच्या पक्षानेच उदयनराजेंना यापूर्वी उमेदवारी देऊन खासदार केले होते; पण ज्या पक्षाची धोरणे लोकांना आवडत नाहीत, त्या पक्षात उदयनराजे आहेत. हे लक्षात घ्यावे. भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे झाल्यास, आरोप सिद्ध झाले, तर मी राजकारण सोडून देईन. हे मी पूर्वीही जाहीररित्या सांगितले आहे. उदयनराजे हे छत्रपती आहेत, तर मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? मी फक्त जनतेला एवढेच सांगतो की, ‘यशवंत विचार’ जोपासण्यासाठी माझी उमेदवारी आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हा विचार टिकवा, असे माझे जनतेला आवाहन आहे.