Shasan Applya Daari – “शासन आपल्या दारी’ (Shasan Applya Daari)या उपक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च राज्य सरकारने केला आहे. या उपक्रमात जनतेची कामे झाली असती तर त्यांना मंत्रालयापर्यंत येण्याची गरज पडली असती का?
असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “शासन आपल्या दारी’तून केवळ प्रसिद्धी मिळविली जात असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.
वडेट्टीवार म्हणाले, सरकारने मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. सुरक्षेची कारणे देत सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे केले जात आहे.
त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत नागरिक मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे राहवे लागत असून त्यांना सायंकाळी प्रवेश मिळाल्यावर कार्यालयीन कामकाजाची वेळ संपते. त्यामुळे हताश होऊन नागरिक परत जात आहेत. नागरिकांचे हाल सरकारने थांबविले पाहिजेत.
राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अपयशी ठरला असून त्यामुळे जनतेला शासनाच्या दारी म्हणजे मंत्रालयात जावे लागते. पण मंत्रालयात सरकारच्या जाचक अटीमुळे जनतेची तिथेही अडवणूक केली आहे.
यामुळे मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होत नसल्याचा पुरावा आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.