पालघर :- शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीतून महाराष्ट्र महिला संघ राष्ट्रीय स्पर्धेत बीच हँडबॉलमध्ये किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सोनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठी महिला संघ सध्या पालघरनजीकच्या समुद्रकिनाऱ्यावर कसून सराव करत आहे. कर्णधार उज्ज्वला जाधवच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ सध्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणातून आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये बीच हँडबॉल स्पर्धा ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत मिरामार समुद्रकिनाऱ्यावर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेकरिता महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षण शिबिर चिंचणी येथे सुरू आहे. या संघात उज्ज्वला, बीना खडकुंबर्गे, स्नेहल वाघुळे, श्रीशैला भंडारी, मोनाली देशपांडे, सायली खाडे, अर्पिता वाघमारे, स्वप्नजा मोरबाळे, मानसी परब, प्रज्ञा माने असे खेळाडू सहभागी आहेत. प्रशिक्षक व संघव्यवस्थापक म्हणून सचिन भारद्वाज, राकेश ठाकरे, रुपेश मोरे, वैष्णवी जोशी हे काम पाहात आहेत. यंदा बीच हँडबॉल क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला नक्कीच पदक मिळेल, असा निर्धार महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य राजाराम राऊत यांनी व्यक्त केला.
किताबासाठी महाराष्ट्र संघ दावेदार – कर्णधार उज्ज्वला
गोवा येथील राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी महाराष्ट्र हँडबॉल संघ सध्या संघातील खेळाडू शिबिराच्या माध्यमातून आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत आहेत. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्र संघ सोनेरी यश संपादन करेल, असा दावा संघाची कर्णधार उज्ज्वला जाधवने केला आहे.